सांगली जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल; 54 महसूल मंडलांत 21 दिवसांहून अधिक पावसाचा खंड
सांगली / प्रवीण शिंदे : पावसाळा संपण्याच्या टप्प्यावर असतानाच सांगली जिल्ह्यावर पाणीटंचाई आणि दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. जिल्ह्यात यंदा १ जून ते १५ सप्टेंबरदरम्यान सरासरी केवळ ८० टक्के पाऊस झाला असून, तब्बल ६९ महसूल मंडलांपैकी ५४ मंडलांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पावसाच्या खंडाचा निकष पूर्ण झाल्याने जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे जून-जुलैमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या ११३ टक्के पाऊस झाला असल्याने या कालावधीतील ५० टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा निकष लागू होत नाही. मात्र त्यानंतरच्या दीर्घ पावसाच्या खंडाने परिस्थिती गंभीर केली आहे. ८ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीतील एकूण पर्जन्यमानाचा अंतिम आढावा, पिकांची स्थिती आणि उपग्रह प्रतिमांच्या आधारे दुष्काळी परिस्थितीचे अंतिम मूल्यमापन केले जाणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील पाणी उपलब्धतेवर वाढता ताण लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व तलावांमधील पाणी उपशावर बंदी लागू केली आहे. सोमवार, दि. २१ सप्टेंबरपासून कृष्णा आणि वारणा नदीवरही उपसाबंदी लागू करण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी संरक्षित करणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याने सिंचनासाठी अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कोयनेचा 1 हजार क्युसेक विसर्ग; टेंभूला प्राधान्य
सध्या कोयना धरणातून कृष्णा नदीत १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, जिल्ह्याच्या गरजेच्या तुलनेत हा विसर्ग अपुरा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अपेक्षित विसर्ग सुमारे २,५०० क्युसेक असताना सध्या केवळ १ हजार क्युसेक पाणी मिळत आहे. उपलब्ध पाण्यापैकी बहुतांश पाणी सध्या टेंभू उपसा सिंचन योजनेकडे वळविले जात आहे. या माध्यमातून सांगोला, खानापूर आणि कवठेमहांकाळ परिसरातील पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट होत असून, नदीवरील अन्य सिंचन योजनांवर त्याचा परिणाम झाला आहे.
कोयनेतून अपेक्षित २५०० क्युसेकऐवजी १ हजार क्युसेकच विसर्ग होत असल्याने ताकारी उपसा सिंचन योजना सध्या पूर्णपणे बंद आहे. म्हैसाळ योजनेतून मात्र उपलब्ध पाण्यानुसार काही भागांना पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे.
वारणा धरणातून ६०० क्युसेक पाण्याची मागणी
दुष्काळी आणि टंचाईच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सांगली प्रशासनाने वारणा धरणातून ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग १५ ऑक्टोबरपर्यंत करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यास जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त भागांना दिलासा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. विशेषतः जत आणि कवठेमहांकाळच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
जतच्या 75 टक्के मंडलांत पावसाचा मोठा खंड
दुष्काळाच्या निकषांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड हा महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यातील ६९ महसूल मंडलांपैकी तब्बल ५४ मंडलांमध्ये हा निकष पूर्ण झाला आहे. त्यात जत तालुक्यातील सुमारे ७५ टक्के महसूल मंडलांचा समावेश आहे. जत तालुक्यात त्यामुळे टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मागणी असलेल्या ठिकाणी टँकर सुरू करण्यात आले आहेत. काही तलावांची पाणीपातळी २५ टक्क्यांपेक्षाही खाली गेली असून, दोड्डानाला तलावातील पाणीसाठा मृतसंचयाच्या जवळ पोहोचला आहे. वारणा धरणातून पाणी मिळाल्यास दोड्डानाला तलाव भरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
२३ टँकर धावतायत; ४३ हजार ६८७ ग्रामस्थांना पाणी
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या २३ टँकर सुरू आहेत. त्यापैकी २१ खासगी आणि २ शासकीय टँकर आहेत. या टँकरद्वारे २६ गावे आणि १६० वाड्यांमधील ४३ हजार ६८७ ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाई वाढल्यास टँकरची संख्या आणखी वाढविण्याची प्रशासनाची तयारी आहे. नागरिकांनी पाणीटंचाई जाणवत असल्यास संबंधित पंचायत समितीकडे मागणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
30 सप्टेंबरनंतर दुष्काळाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार
दुष्काळ जाहीर करण्यासाठी विविध निकषांच्या आधारे परिस्थितीचे मूल्यांकन केले जाते. जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीत २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाच्या खंडाचा निकष स्पष्टपणे दिसून येत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. दरम्यान, ८ जून ते ३० सप्टेंबरदरम्यानच्या पर्जन्यमानाची अंतिम आकडेवारीही तपासली जाणार आहे. या कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास संबंधित निकषाचाही विचार केला जाईल.
पाण्याची टंचाई दिसत असेल तर…
“पाण्याची टंचाई दिसत असेल तर संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावा. त्या ठिकाणी तात्काळ पाहणी करून टँकर सुरू केला जाईल. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अशा प्रकारे मागणी आल्यास तात्काळ टँकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनही त्यासाठी कटिबद्ध आहे. उपसा बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, गणेश विसर्जन नदीत किंवा सार्वजनिक जलस्त्रोतांमध्ये न करता कृत्रिम कुंडात करावे”
– मैनाक घोष, जिल्हाधिकारी, सांगली






