कणकवली: कोकणातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्ते खराब असल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. सतत घडत आलेल्या अपघातामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राजकारणी मंडळी गावात येत आहेत मात्र रस्ते दुरुस्तीकडे कोणाचेही लक्ष नसल्याने शिरवलगावातील ग्रामस्थांनी अनोखी शक्कल लढवल्याचे दिसून आले आहे.
शिरवल मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.कार्यारंभ आदेश दिड महिन्यांपूर्वी होऊन सुद्धा कामाला सुरुवात होत नसल्याने शिरवल ग्रामस्थांनी “आधी रस्ता करा नंतर प्रचार करा,” “गावात राजकीय पक्षांना प्रचार बंदी!” अशा आशयाचा बॅनर लावून बॅनरच्या माध्यमातून जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर याची दखल प्रसार माध्यमांनी घेतली.आणि वृत्त प्रसिद्ध करुन आवाज उठविला आणि प्रशासन खडबडून जागे झाले.शिरवलमध्ये दाखल झाले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता श्री.सुतार यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या टीम सोबत येत शिरवल ग्रामस्थ आणि उपसरपंच प्रविण तांबे यांची भेट घेऊन रस्त्याची पाहणी केली आणि आपण ठेकेदाराला रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी सुचना केल्याचे सांगितले.
बुधवारी सकाळपासून रस्त्याच्या कामाला ठेकेदाराने सुरुवात केल्याने ग्रामस्थांच्या मागणीला यश आले.त्यामुळे शिरवल वासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करावे. अशी सूचना उपअभियंता श्री.सुतार यांना यावेळी केली. शिरवल रस्त्याचे काम सुरु झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.