
तापमानात चढ-उतार
कोकणात उष्णतेच्या झळा वाढणार
कोकण किनारपट्टीवर तापमान तुलनेने अधिक
गुहागर: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाड्याची चाहूल लागली आहे, किमान तापमानातही चढ-उतार सुरू असून पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उन्हाच्या झळा अधिक जाणवण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल व किमान तापमानात सातत्याने बदल होत असून शुक्रवारी अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली.
मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. यंदाच्या हंगामातील तसेच फेब्रुवारी महिन्यातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले. कुलाबा केंद्रात कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यापेक्षा ३.३ अंशांनी जास्त होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या आठवडाभरात मुंबईसह कोकण पट्टधात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीवर – तापमान तुलनेने अधिक
सरासरी तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर काही भागांत त्याहून अधिक नोंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये किमान तापमानात फारसा बदल अपेक्षित नसून ते १४ ते १६ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. कोकण किनारपट्टीवर मात्र किमान तापमान तुलनेने अधिक राहण्याचा अंदाज आहे. सध्या मध्य महाराष्ट्र व सातारा परिसरात वाऱ्यांचा वेग वाढलेला असून पुणे परिसरात आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
२७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ हवेची नोंद
मुंबई शहर हे प्रदूषणाचे केंद्र मानले जात असले, तरी ताज्या हवा दर्जा गुणांक (एक्यूआय-एअर क्वालिटी इंडेक्स) आकडेवारीने वेगळेच वास्तव समोर आणले आहे. शहराच्या तुलनेत उपनगर आणि लगतच्या नवी मुंबई परिसरात हवेची गुणवत्ता अधिक घसरलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण २७ ठिकाणी ‘खराब’ ते ‘अतिखराब’ श्रेणीतील हवेची नोंद झाली असून, त्यापैकी बहुतांश ठिकाणे ही उपनगरात किंवा औद्योगिक व वाहतूकदृष्ट्या संवेदनशील भागात आहेत. नवी मुंबईतील नेरूळ येथे सर्वाधिक २०३ एक्यूआय नोंदला गेला असून, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात १७९, तर महापे येथे १७२ एक्यूआय नोंदवण्यात आला आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.