
अरे बापरे! शोरमा-पिझ्झा खाल्ल्याने १०७ जणांना अन्न विषबाधा; ३६ तासांनंतर नेत्यांची रुग्णालय भेट
प्राथमिक माहितीनुसार, खंडूपाडा परिसरातील अनेक नागरिकांनी ‘फेमस शोरमा’ दुकानातून चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ले होते. त्यानंतर अनेकांना अचानक उलट्या, मळमळ, पोटदुखी, जुलाब आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागली. काही तासांतच बाधितांची संख्या वाढत गेल्याने त्यांना तातडीने भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी अद्याप रुग्णालयाला भेट न दिल्याने त्यांच्या कार्यत्परतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने भिवंडी उपजिल्हा रुग्णालयावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. काही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत असली, तरी बाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
घटनेला सुमारे ३६ तास उलटल्यानंतर भिवंडीचे महापौर नारायण चौधरी आणि भाजप आमदार महेश चौघुले यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टर आणि प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक उपचार आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. सद्यस्थितीत अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा १०७ वर पोहचला आहे. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. परंतु इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल होऊन FDA ने दुकान सील केले आहे.
दरम्यान, या गंभीर घटनेनंतरही भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी अद्याप रुग्णालयाला भेट दिलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची दखल घेत आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अन्न विषबाधेचे नेमके कारण काय, अन्नपदार्थांच्या साठवणुकीत किंवा स्वच्छतेत काही त्रुटी होत्या का, याचा तपास सुरू असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
या घटनेमुळे भिवंडी शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ खाताना स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
यावेळी भाजपा आमदार महेश चौघुले यांनी FDA च्या कारभारावर टीका केली. मोठ्या हॉटेल्सवर दिखाऊ कारवाई करून FDA फक्त खिसे भरण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. छोट्या दुकानांवर लक्ष देण्याची खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार गुन्ह्यातील कलमे वाढवून आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.