'निरोगी मन, सुलभ जीवन' जागृती मोहीम! योग दिनानिमित्त मुंबईत ५० ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन; आध्यात्मिक उन्नतीचे प्रयत्न
‘निरोगी शरीर, शुद्ध मन आणि जागृत आत्मा’ या पवित्र संकल्पाची पूर्तता करत, संत निरंकारी मिशन आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक व्यापक योग आणि आध्यात्मिक जागृती मोहीम आयोजित करत आहे. सदुरू माता सुदीक्षा महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने आणि दूरदर्शी मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली ही प्रेरणादायी मोहीम, मानव कल्याण, सर्वांगीण आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी एक अर्थपूर्ण प्रयत्न आहे. सगुरू मातांचा ‘निरोगी मन, सुलभजीवन’ हा प्रेरणादायी संदेश हे सत्य स्थापित करतो की, जीवनातील खरी समृद्धी केवळ शारीरिक आरोग्यातच नाही, तर मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक जागृतीमध्येही आहे.(फोटो सौजन्य – istock)
सदूरू मातांच्या मते, मानवी शरीर ही देवाने दिलेली एक अद्वितीय देणगी आहे, ज्याची काळजी आणि सामर्थ्य व्यक्तीला आपल्या आध्यात्मिक, सामाजिक आणि मानवतावादी जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडण्यास सक्षम करते. ही मोहीम योगाला केवळ एक शारीरिक व्यायाम म्हणून नव्हे, तर आत्मसाक्षात्कार, आंतरिक शांती, मानवी ऐक्य आणि वैश्विक बंधुत्वाची भावना जोपासणारी एक समग्र जीवनशैली म्हणून स्वीकारण्याचा संदेश देते. याच प्रेरणादायी भावनेला अनुसरून, संत निरंकारी मिशन मुंबईतील सुमारे ५० ठिकाणी दर रविवारी सकाळी ६ वाजता योग सत्रांचे आयोजन करत आहे. याव्यतिरिक्त, मिशनच्या विविध शाखांमध्ये स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोकळ्या मैदानांवर आणि उद्यानांमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये भक्त, सेवादल स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक उत्साहाने सहभागी होतील.
या वर्षी, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘निरोगी वार्धक्यासाठी योग’ ही आहे. हा संदेश आपल्याला आठवण करून देतो की, खरे आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्त शरीर नव्हे, तर मानसिक स्थिरता, भावनिक परिपक्वता, सामाजिक सलोखा आणि आध्यात्मिक जागृती यांचे एक समग्र रूप आहे. हाच दृष्टिकोन स्वीकारून, संत निरंकारी मिशन योगाला संतुलन, सकारात्मकता आणि आत्मसाक्षात्कारासाठी एक प्रभावी माध्यम मानून समाजात जागृती पसरवत आहे.
आजच्या व्यस्त आणि आव्हानात्मक जीवनशैलीत, संत निरंकारी मिशनच्या अशा सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांचा मुख्य उद्देश लोकांमध्ये त्यांच्या सर्वांगीण आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे, जेणेकरून ते योगाला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवून निरोगी, संतुलित, उत्साही आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकतील.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव, जोगिंदर सुखीजा यांनी सांगितले की, फाउंडेशन २०१५ पासून नियमितपणे देशव्यापी ‘योग दिन’ मोहीम आयोजित करत आहे. योग हा भारताचा प्राचीन आणि गौरवशाली वारसा आहे, जो केवळ शरीरालाच सशक्त करत नाही, तर मनाला स्थिरता, विचारांना सकारात्मकता आणि आत्म्याला जागृती देखील देतो. नियमित सरावाने तणाव आणि जीवनशैलीतील आव्हानांवर मात करण्यास मदत होते, ज्यामुळे व्यक्ती आध्यात्मिक समाधान, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक सलोख्याकडे वाटचाल करतात.






