
मिरा-भाईंदरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर ‘मैदानबंदी’? नव्या भाडे धोरणावरून भाजप-शिवसेना आमनेसामने
भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नव्या मैदान भाडे धोरणावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावित धोरणानुसार भाईंदर पश्चिमेतील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान आणि आरक्षण क्रमांक २४६ येथील पद्मभूषण मेजर ध्यानचंद मैदान या मैदानांवर धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नवरात्रोत्सव, दहीहंडी, आर्ट फेस्टिव्हल, कोकणी महोत्सव यांसारख्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपची सत्ता असून शिवसेना आणि काँग्रेस विरोधी बाकावर आहेत. राज्यात महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर मैदानाच्या धोरणावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
महापालिकेच्या प्रस्तावित धोरणात मैदानांचा वापर प्रामुख्याने क्रीडा उपक्रमांसाठी करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. राष्ट्रीय महत्त्वाचे कार्यक्रम तसेच महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. मात्र, राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्नकार्य, साखरपुडा, प्रदर्शने आणि काही करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी मैदाने उपलब्ध करून न देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. इतर मैदानांवर धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अतिरिक्त परवानगीची आवश्यकता राहणार आहे.
विशेषतः स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान आणि मेजर ध्यानचंद मैदान ही मैदाने विविध मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरली जातात. नागरिकांसाठी मोफत आयोजित होणारे आर्ट फेस्टिव्हल, कोकणी महोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सव यांसारख्या कार्यक्रमांसाठी या मैदानांना महत्त्व आहे. त्यामुळे प्रस्तावित धोरणामुळे अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निर्णयावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. “मुघलांना जसे झोपेतून उठल्यावर संताजी-धनाजीचे घोडे दिसत होते, तसे मिरा-भाईंदरच्या सत्ताधाऱ्यांना एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक दिसत आहेत. सत्ताधारी झाल्यानंतरही नागरिकांसाठी मोफत असलेले कार्यक्रम बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांचे हे निर्णय टिकणार नाहीत,” असा दावा सरनाईक यांनी केला.
दरम्यान, स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांनी हा निर्णय राजकीय हेतूने घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले. “मिरा-भाईंदरमध्ये दोनच चांगली मैदाने आहेत. या मैदानांचा वापर खेळाडूंसाठीच व्हावा, असे आमचे मत आहे. इतर कार्यक्रमांमुळे मैदानांचे मोठे नुकसान होते आणि त्याचा आर्थिक भुर्दंड महापालिकेला सोसावा लागतो. त्यामुळे राजकीय हेतूने नव्हे, तर सरसकट राजकीय पक्षांसह इतर संस्थांनाही ही मैदाने न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे गेहलोत यांनी सांगितले.
मात्र, या नव्या धोरणामुळे नागरिकांसाठी वर्षानुवर्षे आयोजित होणाऱ्या पारंपरिक आणि मोफत सार्वजनिक कार्यक्रमांवरही मर्यादा येणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच काही ठराविक मैदानांवरच धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यामागे नेमका कोणता निकष आहे, यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.