
कल्याण-डोंबिवली परिसरातील वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढीव येणारी लाईटबील, स्मार्ट मीटरसंदर्भात असलेला गोंधळ, मीटर बदले तरीसुद्धा येणारे जास्तीचे बील, वांरवार लाईट जाणे. यासर्व कारणांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मनसे याबाबत नागरिकांच्या तक्रारी गोळा गेल्या त्यानंतर महावितरण प्रशासनाकडे सादर केल्या.
मनसेने दोन हजार नागरिकांच्या सह्यांसह निवेदन कल्याणच्या महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे दिले आहे. शहरातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या मांडल्या आहेत आणि त्या तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा दिला आहे.
महावितरणावर नागरिक संतप्त
नागरिकांचे म्हणणे आहे की नियमितपणे वीजबिल भरूनही अनेकदा अवास्तव रकमेची बिले हातात पडत आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिलांमध्ये अचानक वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. टीओडी मीटरबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. अनेकांनी स्थानिक कार्यालयात तक्रारी केल्या तरी त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही.
वीजपुरवठ्याचा प्रश्नही नागरिकांसाठी मोठी समस्या आहे. शहरातील अनेक भागांत दिवसातून अनेकवेळा वीज जाते, तर काही ठिकाणी कमी-जास्त दाबामुळे घरगुती उपकरणांवर परिणाम होतो. पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते आणि विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि लघुउद्योजकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारींची यादी दिली आहे आणि प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे. ग्राहकांना कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, तक्रार निवारण प्रक्रिया वेगवान व्हावी आणि वाढीव बिलांबाबत पारदर्शक चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नागरिकांकडून चांगला प्रतिसाद
या उपक्रमाला परिसरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक रहिवाशांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात पक्षाकडे दिल्या आहेत आणि त्या महावितरणपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. नागरिकांचे प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
मनसेने महावितरण प्रशासनाला आठ दिवसांचा अवधी दिला आहे. या कालावधीत तक्रारींवर ठोस निर्णय झाला नाही, तर सर्व वीज ग्राहकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. या आंदोलनाची जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
या निवेदनावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल कामत, शहराध्यक्ष हर्षद पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला आणि पुरुष शाखा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील वीज समस्यांवर तातडीने तोडगा निघावा आणि ग्राहकांना दिलासा मिळावा, हीच नागरिकांची प्रमुख अपेक्षा आहे.