
फोटो सौजन्य- गुगल
येत्या सोमवारी श्रीगणेशाचे आगमन होत असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनाची तयारी वेगाने सुरू केली आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच विसर्जन घाटांवर आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुरू असलेल्या कामांचा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून आढावा घेतला. विसर्जन घाटांवरील सर्व कामे रविवार १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी वागळे प्रभाग समिती सभापती एकता भोईर, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती सभापती सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेवक संजय वाले, विकास रेपाळे, प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता मोहन कलाल, कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी मंगळवारी मासुंदा तलाव येथील दत्त घाट, रायलादेवी येथील कृत्रिम तलाव तसेच गायमुख येथील विसर्जन घाटांची पाहणी केली. यापूर्वी शुक्रवारी त्यांनी कोपरी, कोलशेत आणि पारसिक येथील विसर्जन घाटांचीही पाहणी केली होती. यावेळी कोपरी प्रभाग समिती सभापती मीनल संखे, कळवा प्रभाग समिती सभापती विजया लासे, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेवक अनिता गौरी, संजय भोईर, उषा भोईर आदी उपस्थित होते. या पाहणीदरम्यान घाटांवरील सुरू असलेली कामे, भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, सुरक्षेची व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि स्वच्छतेबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
दीड दिवसांच्या गणेशमूतींपासून अनंत चतुर्दशीपर्यंत विविध दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे विसर्जन घाटांवर सातत्याने भाविकांची गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने घाटांच्या परिसरात आवश्यक त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महापौरांनी दिल्या, महापालिकेच्या तलावांना बॅरिकेडिंग करणे, विसर्जन घाटावर आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, पावसाची शक्यता लक्षात घेऊन वेदरशेड उभारणे, तसेच भाविकांसाठी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विसर्जन घाटांबरोबरच विविध ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकार केंद्रे उभारण्यात आली आहेत. भाविकांनी या केंद्रांचा लाभघ्यावा आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन घाटांवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेश विसर्जन मिरवणुका शक्य तितक्या लवकर काढाव्यात. विसर्जनाची प्रक्रिया वेळेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका, पोलीस विभाग आणि वाहतूक विभागाकडून वेळोवेळी सूचनांचे मंडळांनी आणि भाविकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौरांनी केले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)