Maratha Reservation : 'मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार'; खासदार शाहू महाराजांचा इशारा (सौजन्य - नवराष्ट्र टीम)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी वेळोवेळी उपोषण-मोर्चे काढले जात आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र करण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे असलेल्या ‘कोल्हापूर गॅझेट’ची अंमलबजावणी आणि प्रशासकीय पातळीवरील कायदेशीर लढाईसाठी बुधवारी खंडेनवमीच्या मुहूर्तावर कोल्हापुरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात विशेष शस्त्र पूजन करण्यात आले.
आता कायदेशीर लढा आणि भारतीय संविधान हातात घेऊनच मराठा आरक्षणावर सरकारला धारेवर धरावे लागेल, असे मत व्यक्त करून खासदार शाहू छत्रपती महाराजांनी मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईंचे रणशिंग फुंकले. यावेळी इतिहास संशोधक जयसिंगराव पोवार उपस्थित होते. भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे ‘शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट, लेखणी आणि भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले.
दरम्यान, मराठा आरक्षण लढा आता वेगळ्या वळणावर पोहचला आहे. आरक्षणासाठी यापूर्वी अनेकवेळा प्रयत्न झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने हालचाल केली. मात्र, त्यातून काय मिळाले याचा अद्याप उलगडा होत नाही. खंडेनवमीच्या मुहूर्तावर कृती समितीने हा लढा हातात घेतला आहे, आता तो आणखी तीव्र करणार आहोत, असा इशारा खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी दिला.
मराठा आणि कुणबी या दोन्ही जाती एकच
१८८१ साली ब्रिटिश काळात तयार करण्यात आलेल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी या दोन्ही जाती एकच असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारावर ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी हा ऐतिहासिक दस्तावेज अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक पुरावा ठरू शकतो, असे मत यावेळी व्यक्त केले गेले.
मराठा आरक्षण लढा आता वेगळ्या वळणावर पोहोचणार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढा सुरू असतानाच, कोल्हापूर गॅझेटच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावर आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न हा मराठा समाजाच्या आंदोलनाला नवी दिशा देणारा ठरू शकतो. जरांगे पाटील आणि खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या एकसंघ आंदोलनामुळे मराठा आरक्षण लढा आता वेगळ्या वळणावर पोहचणार हे मात्र नक्की.