मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला आंदोलनाची हाक दिली असून, त्याच्या पार्श्वभूमीवर अभ्यासकांसोबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत यापूर्वी सरकारसमोर मांडलेल्या मागण्या, त्यातील कायदेशीर बाबी आणि सरकारकडून जारी करण्यात आलेल्या जीआरवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
बैठकीनंतर बोलताना जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत आक्रमक भूमिका कायम ठेवली. आंदोलनाच्या मार्गावरून माघार घेणार नसल्याचे सांगत त्यांनी, ‘जीव गेला तरी चालेल, पण आंदोलनावर ठाम राहणार’ असा निर्धार व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, बैठकीत तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी सरकारने काढलेल्या जीआरमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत, भविष्यातील जीआर कशा पद्धतीने काढले जावेत आणि ओबीसी सवलतींच्या संदर्भात काय भूमिका असावी, यावर अभ्यासकांकडून माहिती घेण्यात आली.
हैदराबाद गॅझेटियर आणि ओबीसी सवलतीसंदर्भातील जीआरमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली. सरकारने विद्यमान जीआरमध्ये काही चुका असल्याचे मान्य करून त्यात दुरुस्ती करावी, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली.
बैठकीत रक्तातील नाते, नातेसंबंध आणि कुळाच्या नोंदींच्या आधारे चौकशी करण्याच्या प्रक्रियेवरही चर्चा झाली. गावस्तरीय समित्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी करण्यात आली. मराठवाड्यात उपलब्ध नसलेल्या जुन्या नोंदी शोधण्याची आवश्यकता असल्याचे अभ्यासकांनी मांडले.
हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दाही चर्चेत आला. तसेच संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. आता 29 ऑगस्टच्या आंदोलनात जरांगे पाटील कोणती भूमिका घेतात आणि सरकारकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल