
तुमचा काळा इतिहास बाहेर काढायला लावू नका; संजय पाटलांचा जयंत पाटलांना इशारा
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर जयंत पाटील यांनी “संजय पाटील यांना आम्हीच भाजपमध्ये पाठवले होते. त्यांच्या माध्यमातून भाजपमधील हालचालींची माहिती मिळत होती,” असा दावा केला होता. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांना उत्तर देताना संजय पाटील यांनी जयंत पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भाजपमध्ये येण्यासाठी तुम्हीच अनेक वर्षे प्रयत्न करत होता. कित्येक वेळा दारं ठोठावली, याचा मी साक्षीदार आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, विश्वासघाताच्या राजकारणावर टीका करत त्यांनी मतदारसंघात गटबाजी वाढवून कार्यकर्त्यांचे नुकसान केल्याचा आरोप केला. “मी कधीही तुमचे नेतृत्व स्वीकारले नाही आणि तुम्ही मला कधीही मदत केलेली नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा परिषद निवड प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप करत संजय पाटील यांनी लाईट बंद करणे, महिला सदस्यांवर दबाव टाकणे व मोबाईल काढून घेणे अशा प्रकारांचा उल्लेख केला. या घटनांची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. जयंत पाटील यांची विधाने ‘बालिश’ असल्याचे सांगत यांनी अशा प्रकारचे आरोप थांबवावेत, अन्यथा कठोर भूमिका घेण्याचा इशाराही संजय पाटलांनी दिला. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर उफाळलेला हा वाद आता अधिक चिघळण्याची चिन्हे असून सांगली जिल्ह्यातील राजकारण पुढील काळात अधिक तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.