संग्रहित फोटो
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे, राज्यात अंधश्रद्धेविरोधातील कायदा असतानाही अशोक खरात सारखा भोंदूबाबा त्याचे गोरखधंदे बिनदिक्कतपणे करतो व त्याची कोणालाच भनक लागत नाही हे विशेष. अशोक खरातच्या ट्रस्टवर असलेले व त्याला पाठबळ देणारे जे लोक आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. आसाराम बापू सोबत नरेंद्र मोदी अनेकदा दिसले होते तीच विकृती महाराष्ट्रात फोफावली आहे. नाशिकमध्ये जी विकृती दिसली त्याचे नवल वाटत नाही. पुरोगामी राज्यात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून असे विकृत लोक सत्तेच्या भरोशावर आपले धंदे राजरोसपणे करतात. भाजपाची खुशामतगिरी करणारी ही प्रवृती महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. अंधश्रद्धा थांबावी यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आयुष्यभर लढा दिला पण त्यांनाच गोळ्या घालून ठार करण्यात आले असे सपकाळ म्हणाले.
महिला आयोगाने महिला शोषणाच्या विरोधात काम करणे अपेक्षित आहे पण महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केली हे त्यांचे कृत्य खरातसारख्या भोंदूना पाठबळ देणारे आहे. असा प्रकार त्यांच्याकडून पहिल्यांदाच झालेला नाही तर पुण्यातील हगवणे प्रकरण असो वा साताऱ्यातील महिला डॉक्टरचे प्रकरण, चाकणकर आरोपीची पाठराखण करताना दिसल्य़ा आहेत. खरे तर त्यांचे कामकाज पाहता आतापर्यंत त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.






