
अमरावती शहरात जीर्ण इमारतींची समस्या! मनपाने उपाययोजना कराव्या; पावसाळ्यापूर्वी मोठ्या दुर्घटनेची भीती
मे महिन्याचा एक आठवडा उलटून गेला असून आगामी महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. मात्र शहरातील अनेक उंच इमारती आतून अत्यंत जीर्ण व मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभ्या आहेत. विशेषतः राजापेठ परिसरात अशा इमारतींची संख्या सर्वाधिक असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.(फोटो सौजन्य – AI)
राजापेठ झोनमध्ये सध्या किमान १४ अत्यंत जीर्ण इमारती अद्याप उभ्या असून त्यापैकी ३ इमारती तब्बल १०० वर्षे जुन्या असल्याची माहिती समोर आली आहे. महानगरपालिकेने संबंधित मालकांना नोटिसा बजावून आपली जबाबदारी पूर्ण केल्याचे दिसत असले; तरी प्रत्यक्षात या इमारतींच्या पाडकामाबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. राजापेठ उड्डाण पुलालगत असलेली गोदावरीबाई देविदास झाडे यांची सुमारे ७० वर्षे जुनी इमारत सर्वाधिक धोकादायक मानली जात आहे. या इमारतीच्या खालच्या मजल्यांवर अजूनही काही व्यावसायिक आस्थापने सुरू आहेत. त्यामुळे दररोज शेकडो नागरिक येथे ये-जा करतात. तरीही या धोकादायक इमारतीबाबत महापालिकेने कोणतीही कठोर पावले उचललेली नाहीत.
एकवीरा देवी संस्थानची सुमारे १०० वर्षे जुनी इमारत तसेच त्याच परिसरातील ८० वर्षे जुनी दुसरी इमारत यांनाही २३ जून २०२५ रोजी नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. याशिवाय राजकमल चौकातील गिरीश मेहता यांची १०० वर्षे जुनी इमारत, हार्वे सभापती कंपाउंडमधील बाबाराव कोंडलवार यांची ८० वर्षे जुनी इमारत, तसेच जयस्तंभ चौकातील दंडे बिल्डिंग या इमारतींनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. दंडे बिल्डिंगला २७ नोव्हेंबर २०२४ रोजी नोटीस देऊन पाडण्याचे आदेश दिले असले तरी ती अद्याप उभी आहे. पावसाळ्यात या इमारती कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन
तख्तमाल इस्टेट व्यावसायिक संकुलात असलेली सारंगपाणी श्रीरंग चांडक यांची सुमारे ७० वर्षे जुनी इमारतदेखील अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. कपड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या या संकुलात दररोज हजारो ग्राहक, विशेषतः महिला व मुले येतात. तरीही महानगरपालिकेने या इमारतीबाबत केवळ नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कारवाई केलेली नाही. पावसाळ्यात ही इमारत कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रभात टॉकीजजवळील राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावर असलेल्या राजदीप कलेक्शन दुकानाला महापालिकेने ‘सी-१’ म्हणजे अत्यंत जीर्ण इमारत म्हणून घोषित केले होते, निर्जंतुकीकरण करून वीजपुरवठाही बंद करण्यात आला होता, मात्र दुरुस्तीला परवानगी दिल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. पाडकाम सुरू असतानाच दुकानाचा स्लॅब कोसळून ६ कामगारांचा मृत्यू झाला होता. एवढी गंभीर घटना घडूनही जीर्ण इमारतींबाबत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची टीका होत आहे.