
रस्ते अपघातांचे वाढते संकट, दररोज शेकडो जणांचा मृत्यू; लाखो कुटुंबांवर कोसळतोय दुःखाचा डोंगर
बारामती/अमोल तोरणे : रस्ते अपघात हा भारतासमोरील सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक-आर्थिक प्रश्न बनला आहे. महाराष्ट्रासह देशभरात दररोज शेकडो अपघात घडत असून, त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. हजारो नागरिक गंभीर जखमी होत असून, अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. परिणामी केवळ एका व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होत नाही, तर संपूर्ण कुटुंब आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडत आहे.
वाहनांची झपाट्याने वाढणारी संख्या, अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, मद्यपान करून वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत किंवा संदेश पाठवत वाहन चालविणे, वाहन चालवताना चालकाला डुलकी लागणे, रस्त्याची सुरू असलेली कामे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर टाळणे, निकृष्ट रस्ते, धोकादायक वळणे, अपुरा प्रकाश, चुकीची ओव्हरटेकिंग आणि निष्काळजी वाहनचालक ही अपघातामागील प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सन २०२४ (तात्पुरती आकडेवारी) मध्ये राज्यात ३६,०८४ रस्ते अपघात नोंदविण्यात आले. या अपघातांमध्ये १५,३३५ नागरिकांचा मृत्यू, तर ३०,७३० हून अधिक नागरिक जखमी झाले. यावरून राज्यात दररोज सरासरी ९९ अपघात, ४२ मृत्यू आणि ८४ जखमी होत असल्याचे दिसून येते.
यापूर्वी २०२३ मध्ये राज्यात ३५,२४३ अपघात, १५,३६६ मृत्यू आणि २९,७६४ जखमी नोंदविण्यात आले होते. यावरून अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग, शहरांतील गर्दीचे रस्ते तसेच ग्रामीण भागातील अरुंद व खराब रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण आहे. विशेषतः पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि इतर मोठ्या शहरांमध्ये वाहनांची वाढती संख्या ही मोठी समस्या ठरत आहे.
देशातील परिस्थिती आणखी भयावह
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये देशभरात सुमारे ४.८७ लाख रस्ते अपघात झाले. त्यामध्ये १,७७,१७५ नागरिकांचा मृत्यू, तर ४.७१ लाखांहून अधिक नागरिक जखमी झाले. याचा अर्थ भारतात दररोज सरासरी १,३३५ रस्ते अपघातात ४८५ मृत्यू झाले आहेत. तर १,२९० हून अधिक जखमी झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक तासाला सरासरी ५६ अपघात आणि २० जणांचा मृत्यू होत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, भारत हा जगातील सर्वाधिक रस्ते अपघात होणाऱ्या देशांपैकी एक मानला जातो.
तरुणांचा सर्वाधिक बळी
रस्ते अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा वयोगट देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा मानला जातो. त्यामुळे या अपघातांमुळे देशाच्या उत्पादक मनुष्यबळाचे मोठे नुकसान होत आहे. देशातील रस्ते अपघातांमधील मृत्यूंपैकी सुमारे दोन तृतीयांश मृत्यू हे दुचाकीस्वार आणि पादचारी यांचे असल्याचे मंत्रालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हेल्मेट न वापरणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि रस्ता ओलांडताना निष्काळजीपणा ही प्रमुख कारणे आहेत.
अपघातांचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम
रस्ते अपघातामुळे केवळ जीवितहानी होत नाही, तर कुटुंबाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन गमावले जाते. उपचारांवर लाखो रुपयांचा खर्च होतो. अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात, तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना आयुष्यभर अपंगत्वासह जगावे लागते. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होतो.
अपघात रोखण्यासाठी खालील उपायांची गरज
कायदे आणि दंड याबरोबरच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक वाहनचालकाने वेगमर्यादा पाळणे, हेल्मेट व सीटबेल्ट वापरणे, मद्यपान करून वाहन न चालविणे आणि मोबाईलचा वापर टाळणे, या साध्या नियमांचे पालन केल्यास हजारो जीव वाचू शकतात.