
वडाप चालकांमुळे चौकांतील परिस्थिती आणखी गंभीर
वडाप चालकांनी चौकांमध्ये वाहने आडवी उभी केल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनते, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकामध्ये तीव्र आहे. सोमवार आणि गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे परिस्थिती आणखी नियंत्रणाबाहेर जाते. या दिवशी शहरात दर दोन तासांनी वाहतूक कोंडी होणे ही जणू नित्याची बाब बनली आहे. रुग्णवाहिका, शालेय बस आणि आपत्कालीन सेवांनाही या कोडीचा मोठा फटका बसत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
तासगाव शहराबाहेरील रिंगरोडचा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने शहरातील वाहतूक कोंडी अधिक तीव झाली आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मुरुमीकरण करून काही काळासाठी रस्ता सुरूही करण्यात आला; मात्र त्यानंतर काम पूर्णपणे ठप्प झाले. रिंगरोड पूर्ण झाल्यास शहरातील जड वाहने बाहेरून वळवता येणार असून, कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजयकाका पाटील यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन रिंगरोडचे काम पूर्णत्वास नेण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
चौकांमध्ये पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे
या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन व वाहतुक विभागाने समन्वय साधत तातडीने ठोस उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम, कडक पार्किंग नियम, चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक नियोजन आणि पोलिसांची संख्या वाढवणे यांसारख्या उपाययोजना तातडीन राबवण्याची मागणी जोर धरत आहे.
मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे पोलिस प्रशासन यांनी स्वतः पुढाकार घेऊन व्यापक कारवाई केल्यास शहरातील वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळू शकते अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.