तुषार दोशी साताराचे नवीन पोलीस अधीक्षक
सातारा : साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्तपदी बदली झाली असून, तेथील उपायुक्त तुषार दोशी यांची साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदी नेमणूक देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी तेरा अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेश जाहीर करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पदस्थापनेचा कार्यभार स्वीकारण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे.
नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे २००१ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले. तुषार दोषी यांनी फिजिक्स विषयात पदवी घेतली आहे. नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तुषार दोशी यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूरमध्ये करण्यात आली. राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. चंद्रपूर, गडचिरोली व राजुरा नक्षलींचा प्रभाव असलेल्या भागाचे त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांनी लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये काम केले आहे.
तुषार दोशी हे पुणे पोलीस दलात सायबर विभागात उपायुक्त होते. २०१८ च्या सुमारास नवी मुंबईतील पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असताना जोशी यांनी एजाज खान अटक प्रकरण अश्विनी बिद्रे गोरे हत्या प्रकरण अतिशय कुशलतेने हाताळले होते.
समीर शेख मुंबईचे पोलीस उपायुक्तपदी
प्रशिक्षणासाठी गेलेल्या समीर शेख यांची मुंबई येथे पोलीस उपायुक्तपदी वर्णी लागली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये गडचिरोलीवरून समीर शेख यांची साताऱ्यात बदली झाली होती. त्यांनी येथे आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. आपल्या कारकिर्दीमध्ये ४० टोळ्यांमधील सुमारे १७६ जणांना त्यांनी मोक्का लावला. त्यांच्या कारकिर्दीतील पोलीस क्रीडा प्रबोधिनीने उत्तुंग यश मिळवले तर त्यांनी सुरू केलेली उंच भरारी योजना ही राज्यासाठी मार्गदर्शक ठरली.
प्रतापसिंहनगरमधील दत्ता जाधवच्या दहशतीचा बीमोड प्रतापगड येथील अफजलखान कबरीलगतची अतिक्रमणे हे टप्पे त्यांच्या कारकिर्दीत विशेष उल्लेखनीय ठरले. पुसेसावळी दंगल प्रकरणही त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले होते. मात्र, त्यानंतर समीर शेख यांची अचानक बदली करण्यात आली होती. विधानसभा व लोकसभा निवडणुकां लक्षात घेऊन त्यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती मिळाली होती. तब्बल पावणेतीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यामध्ये कायदा व्यवस्था टिकवण्याचे काम चोखपणे केले.