
वैजापूर तालुक्यात अवकाळीचा तडाखा
छत्रपती संभाजीनगर : तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी सातत्याने बरसत आहेत. गुरुवारी रात्री तालुक्यातील बहुतांश भागात विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशीही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहिला. एप्रिलच्या सुरुवातीलाच पडलेल्या या पावसामुळे वातावरणातील उष्णता काहीशी कमी झाली असली, तरी काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या रब्बी पिकांसाठी हा पाऊस घातक ठरत आहे.
कांदा, गहू, बाजरी, मका आणि हरभरा ही प्रमुख पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात असताना आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून शेतातच सुकण्यासाठी ठेवलेले गहू व हरभऱ्याचे ढिग पूर्णपणे भिजल्याने त्यांची गुणवत्ता घसरली आहे. ओलसर झालेल्या धान्याला अंकुर फुटण्याचा धोका निर्माण झाला असून बाजारात दर घसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पावसाने बिघडवले शेतकऱ्यांचे नियोजन
मका आणि बाजरीच्या पिकांनाही पावसाचा फटका बसला असून, अनेक ठिकाणी कणसे जमिनीवर पडल्याचे चित्र दिसत आहे. पिके आडवी पडल्याने काढणी करणे कठीण झाले आहे. काही शेतांमध्ये पाणी साचल्याने उरलेली उभी पिके सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे काढणीचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मजूर उपलब्धतेचा प्रश्न, वाहतुकीतील अडचणी आणि ओलसर पिकांमुळे वाढलेला खर्च यामुळे आर्थिक ताण वाढला आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणि कर्जाचा बोजा असताना हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
ज्वारीसह गहू, कांदा पीक झाले जमीनदोस्त
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, पिकविमा दाव्यांची प्रक्रिया सुलभकरावी तसेच बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वेळेवर मदत मिळाल्यासच शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. कांदा पिकाला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कांद्याची काढणी सुरू होती, तर काही ठिकाणी काढलेला कांदा शेतात वाळत टाकलेला होता.
कांदा पिकाला बसतोय मोठा फटका
अचानक झालेल्या पावसामुळे हा कांदा पूर्णपणे भिजून सडण्याची भीती निर्माण झाली आहे. साठवणुकीसाठी तयार केलेल्या चाळींमध्येही ओलावा वाढल्याने कांद्याचे आयुर्मान कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी उत्पादन कमी दरात विकावे लागण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
Satara Karad Hailstorm : कराड तालुक्याला पावसाचा तडाखा, गारांमुळे 45 सोलर पॅनल्स फुटले