
अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; अनेक पिके जमीनदोस्त, बागांचेही नुकसान
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतीपिकांसह जनावरांनाही फटका बसला आहे. पंढरपूर तालुक्यात सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने आणि सुसाट वादळी वाऱ्याने द्राक्ष व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काढणीला आलेली ज्वारी, गहू आणि हरभरा पिके शेतातच जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांनी प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार समाधान आवताडे यांचे प्रशासनाला सूचना नुकसानीची व्याप्ती पाहता आमदार आवताडे यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंढरपूर व मंगळवेढा परिसरातील बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने गतीने काम करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेदेखील वाचा : KDMC News : डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद, अर्धवट कामामुळे भाडेकरू अडचणीत; केडीएमसी अधिकाऱ्यांचा प्रताप
सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे मंगळवेढ्याच्या काळ्या शिवारात सवर्रत्र हरभरा काढणीला वेग आला असून, शेतामध्ये हरभरा काढल्याचे चित्र आहे. ज्वारी पिके काढणीला आल्याने या पावसामुळे ज्वारीची पिके ही धोक्यात सापडली आहेत. कणसामधील ज्वारीचा फुलोरा धुवून जाण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे. मराठी म्हणीप्रमाणे ‘आई जेवू देईना, बाप भिक मागू देईना’ अशी निसर्गाने अवस्था सध्या शेतकऱ्यांची केली असल्याच्या तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
द्राक्षबागांसह डाळिंब पिकांचेही नुकसान
द्राक्षबागा, डाळिंब, आबा, गहू, करडई याही पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. शासनाने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मंगळवेढ्यात अचानक सुरू झाला ढगांचा गडगडाट
मंगळवेढ्यात अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांचे झाले. नुकसान, पंचनामे करण्याची शेतकरीवर्गातून मागणी होत आहे. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात दिवसभर ढग व ऊन असा नैसर्गिक पाठशिवणीचा खेळ सुरु असताना सायंकाळी अचानक ढगांचा गडगडाट करत अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचे वृत्त आहे. दरम्यान सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे हरभरा पिके शेतात काढून ठेवल्याने पिकांची हाणी झाल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. भोसे येथे वीज पडून एका शेतकर्याची देशी गाय मृत पावल्याची घटना घडली आहे.
वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा पीक झाले जमीनदोस्त
दक्षिण सोलापूरातील भंडारकवठे, निंबर्गी सादेपूर आणि मंदूध परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजता आणि रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारनंतर मंद्रूप, लवंगी, बाळगी आणि सादेपूर परिसरात वादळी वा-याला सुरुवात झाली. तासाभराच्या वादळानंतर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. जवळपास पंधरा मिनिटे हा पाऊस सुरू होता. पावसाने वातावरण पावसाळ्याप्रमाणे बनले होते. रात्री पुन्हा ८.३० वाजण्याच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली.