
मंत्रिपद मिळाले नसले तरीदेखील हिवाळी अधिवेशनाला हजेरी; वळसे पाटलांकडून सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन
रांजणी/ रमेश जाधव : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महायुतीतील अनेक ज्येष्ठ माजी मंत्र्यांना मंत्रीमंडळात डावलल्याने सध्या महायुतीत नाराजी नाट्य चालू आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनी हिवाळी अधिवेशनाला दांड्या मारल्या, तर काहींनी बंडाचे अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र आंबेगाव तालुक्याचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. मंत्रिपद मिळाले नसले तरी देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता आपण नाराज नाही असे अप्रत्यक्षरित्या दाखवून दिले. नागपुरच्या अधिवेशनात वळसे पाटील यांनी सहभाग घेऊन आपल्या गेल्या ३५ वर्षातील राजकारणातील सुसंस्कृतपणा जोपासला आणि इतर नवोदित आमदारांना सुसंस्कृतपणाचे दर्शनही घडवले.
महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दोन दिवसापूर्वी नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पार पडला. या अधिवेशनामध्ये महायुतीतील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना आणि आमदारांना मंत्रीपदासाठी डावलण्यात आले. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तसेच पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आणि कोकणातील माजी मंत्री दीपक केसरकर भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचबरोबर आंबेगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि विजय शिवतारे तसेच भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली. या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टिकेची झोड उठवली.
कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही
दरम्यान सलग २५ वर्ष राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची विविध पदे सांभाळलेल्या दिलीप वळसे पाटील यांचा देखील आत्ताच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात पत्ता कट झाला. मात्र वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. उलट त्यांनी नागपूर येथे सध्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सलग दोन दिवस हजेरी लावून आपण मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज नसल्याचे दाखवून दिले आणि राजकारणातील सुसंस्कृतपणा त्यांनी जोपासला.
‘पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार’
महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी न दिल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना टार्गेट केले तर पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी महाराष्ट्राचा बिहार झालाय असे जाहिर वक्तव्य करून शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंत्रिपदासाठी विचार न झाल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांना टार्गेट करण्याचा अप्रत्यक्षरीत्या प्रयत्न केला. मात्र या सर्वांना दिलीप वळसे पाटील अपवाद ठरले. मंत्रीपद न मिळाल्याने वळसे पाटील यांनी प्रसार माध्यमे अथवा इतर पक्षातील नेत्यांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
सामाजिक हित जोपासण्याचा प्रयत्न
राज्याच्या राजकारणात राजकारण आणि समाजकारण करत असताना वळसे पाटील यांनी सातत्याने सामाजिक हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. बोलणे कमी मात्र कामाप्रति निष्ठा ठेवुन आणि सामाजिक कामे करून देण्यात त्यांचा सातत्याने हातखंडा राहिला आहे. आंबेगाव तालुक्यातून सलग आठ वेळा विधानसभेचे आमदार म्हणून वळसे पाटलांनी विजय मिळवला आणि जनतेही गेली ३५ वर्षे त्यांचे नेतृत्व स्विकारले. आगामी काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वळसे पाटलांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कामाची योग्य ती पोचपावती देईल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.