
सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई
Wardha News : लवकरच गणेशोत्सव, नवरात्र ते थेट दिवाळीपर्यंत सण उत्सवांची रेलचेल राहणार आहे. या काळात विविध खादय पदार्थ व मिठाईची भेसळ रोखण्यासाठी अन्न औषधी प्रशासन विभागाने देखील कंबर कसली आहे. वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ५९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. ३५ जणांना नोटीस बजावण्यात आली. ५ दुकानदारांना २७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ४ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
सण-उत्सवाच्या काळात बाजारात मिठाईला सर्वाधिक मागणी असते. सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गोडधोड खरेदी करतात. मात्र, याच वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत नफ्याच्या लालसेपोटी शहरात अनेक ठिकाणी शिळ्या आणि आरोग्यास घातक असलेल्या मिठाईची राजरोस विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या एफएसएसआयच्या आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वानुसार बेस्ट बिफोर युज लिहिणे आवश्यक आहे. अनेक दुकानात उघड्यावर मिठाई बनवून डब्ब्यात सील केल्या जाते. त्यावर बेस्ट बिफोर युज तारीख लिहिण्यात येत नाही.
मिठाईच्या दुकानांमध्ये नियमांचे उल्लंघन करीत ग्राहकांच्या जीवाशी खेळ करण्यात येतो. गणेशोत्सव अवघ्या ३ आठवड्यांवर आला असून तयारीसाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. मूर्ती, सजावट, मंडपासह, मिरवणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. या धांदलीत महाप्रसादासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मंडळांनी परवानगी न घेताच महाप्रसाद केला आणि भक्तांना वाटला तर अध्यक्षांसह कार्यकत्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही
गणेशोत्सवासोबतच नवरात्रोत्सवातही महाप्रसादाची धूम जोरात असते. गणेश आगमनाच्या पहिल्याच दिवसापासून महाप्रसादांना सुरुवात होते. ११ दिवस सर्वत्र महाप्रसाद सुरू असतात. हजारो भक्तांच्या पंगती उठतात. पण, पंगती उठवण्यापूर्वी महाप्रसादाची परवानगी घ्यावी लागते, हे कार्यकत्यांच्या गावीही देखील नसते. यंदा याची खबरदारी आधीच घ्यावी लागेल. गणेशोत्सवातही हा धडाका कायम राहणार आहे. शहरासह ग्रामीण भागातही दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ग्रामीण भागातही १० दिवस धार्मिक उपक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन केले जाते. उत्सव साजरा करताना गणेश मंडळांना भाविकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य द्यावे लागणार आहे. यासाठी या मंडळांनादेखील महाप्रसादासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.
सणाच्या काळात खवा, मावा, पेढे, काजू कतली आणि बंगाली मिठाईला मोठी मागणी असते. मागणी वाढणार याचा अंदाज घेऊन अनेक व्यावसायिक आठवडा-पंधरवडा आधीच मिठाई तयार करून ठेवतात. योग्य तापमानात साठवणूक न केल्याने दुधापासून बनवलेले पदार्थ लवकर खराब होतात, त्याला बुरशी येते. नफ्याच्या लालसेपोटी हीच शिळी मिठाई आकर्षक बॉक्समध्ये पॅक करून ग्राहकांच्या माथी मारली जाते.
गणेशोत्सवात महाप्रसाद करून भक्तांना वाटण्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे हा नियम जुनाच आहे. सर्वच सार्वजनिक उत्सवातील महाप्रसादासाठी परवानगी आवश्यक आहे. पण, त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नव्हती. मंडळांची मोठी संख्या, राजकीय हस्तक्षेप, धार्मिक बाब आणि प्रशासनाकडे मनुष्यबळाचा अभाव, आदी कारणांनी परवानगीची प्रक्रिया गांभीर्याने आणि जोरदारपणे राबवली जात नव्हती. यंदा मात्र मुंढे यांच्यामुळे ही मोहीम काटेकोरपणे राबवली जाण्याची शक्यता आहे.
यावर वर्ध्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल टोपले म्हणाले, “आगामी काळात मोठ्या प्रमाणात सण उत्सवाला सुरुवात मिठायामध्ये भेसळ केली जाते. हे नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी आगामी काळात कारवाई मोहीम गतिमान करण्यात येणार आहे. गणेशोत्सव व दुर्गा उत्सव दरम्यान सार्वजनिक ठिकाणी अन्न शिजवणे, वाटप अथवा विक्री करणे यासाठी नोंदणी आणि परवानगी सक्तीची आहे. धार्मिक कार्यास महाप्रसाद शिवणण्यासाठी वाटप करण्यासाठीही परवानगी आवश्यक आहे. अन्यथा एफडीए कारवाई करू शकते. त्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधून अर्ज करावा आणि नियमांचे पालन करावे.”