
फोटो सौजन्य - Social Media
यंदाच्या खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाने व्यापक नियोजन केले असून तब्बल ४ लाख १ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे प्रस्तावित क्षेत्र ५ हजार १६२ हेक्टरने वाढले आहे. यंदाही जिल्ह्यात सोयाबीन पेरणीला प्राधान्य राहणार असले तरी काही प्रमाणात क्षेत्र घटण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
खरीप हंगामाच्या तयारीसंदर्भात ३० एप्रिल रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खत, बियाणे आणि किटकनाशकांच्या उपलब्धतेसह पेरणीपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. गतवर्षी जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार ३३३ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती, तर यंदा ३ लाख ९४ हजार ४९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यंदाच्या नियोजनानुसार सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक २ लाख ९६ हजार हेक्टर राहणार आहे. त्याखालोखाल तूर ६५ हजार हेक्टर आणि कपाशी ३२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड अपेक्षित आहे. याशिवाय मूग, उडीद, ज्वारी, तीळ, बाजरी आणि मका या पिकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार कृषी विभागाने बियाणे, खते आणि किटकनाशकांचा संभाव्य साठा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता चांगली असल्याने बहुतांश शेतकरी घरगुती बियाण्यांना प्राधान्य देत आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी घरच्या घरी बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मात्र, शेतकऱ्यांकडून खत व किटकनाशकांच्या कृत्रिम तुटवड्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ऐनवेळी कृषी सेवा केंद्रांकडून अडवणूक होत असल्याच्या तक्रारींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने केवळ नियोजन न करता आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.