राज्यावर दुहेरी संकट! आज किमान तापमान 12 अंशांवर, 3 दिवस पाऊस आणि थंडीचं सावट (फोटो सौजन्य-X)
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या हवामान बदलांमध्ये आता गुलाबी थंडीचाही समावेश झाला आहे. राज्यातील काही भागात पावसाने दडी मारली असली तरी, वातावरणातील सततच्या बदलांमुळेच पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दक्षिण महाराष्ट्रावर अजूनही पावसाचं सावटं असल्याचे पाहायला मिळत आहे. उर्वरित राज्यात मात्र थंडीची चाहूल लागल्याचं स्पष्ट होत आहे.
तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या उत्तरेकडील भागात पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी पडू लागली आहे. घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहेत. तर उत्तर महाराष्ट्रात पारा चांगलाच उतरताना दिसत आहे. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली असून, येथील तापमान 12 अंशांवर पोहोचले आहे.
हे सुद्धा वाचा: धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी मतदारांची निघाली भव्य पदयात्रा; जुळे सोलापूरकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत
तर दुसरीकडे पश्चिम बंगाल आणि चेन्नईकडे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. परिणाम पुढचे तीन दिवस अलर्ट देण्यात आला आहे. त्याचा परिणाम किनारपट्टीलगच्या भागांमध्ये दिसत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच १४ आणि 15 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर त्यानंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईतही गारवा जाणवत आहे. येत्या 2 दिवसात आणखी तापमान आणखी खालवण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही रात्री उशिरा तापमानात घट होत आहे. त्यामुळे गारठा वाढला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावर 14-15 नोव्हेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगलीतही 2 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. लातूर-धाराशीव, सोलापूरमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहेत.
दिवसभर जाणवणारी उष्णता आणि रात्री गारठा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर आज आणि उद्या हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 12 ते 17 नोव्हेंबर दरम्यान पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दाट धुके असेल. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्येही सकाळी आणि संध्याकाळी हलके धुके दिसून येत आहे. तर झारखंडमध्ये पुढील ४ दिवस आकाश निरभ्र राहील आणि हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. दिवसभरात अंशतः ढगाळ वातावरण राहील. १५ नोव्हेंबरपर्यंत या हवामानात कोणताही बदल होणार नाही. बिहारमध्येही असेच कोरडे हवामान आहे.
हे सुद्धा वाचा: ‘काँग्रेसला निवडणुकीतून हद्दपार करा’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं आवाहन