
cyclone alert 15 states IMD Weather Update, Monsoon 2026,
Weather Update: राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतासह १५ राज्याना चक्रीवादळासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 30 मे पासून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह 15 राज्यांना हा इशारा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर पावसासह ताशी ९० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह वादळी वारे वाहतील. त्यामुळे हवामान विभागाने या काळात नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात चक्रीवादळासह पावसाने थैमान घातले आहे. यासोबतच आजूबाजूच्या इतर सहा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आणि लगतच्या भागांवर मध्य-ट्रोपोस्फियर स्तरावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती पाहायला मिळत आहे. हे सर्व संकेत पाहता देशात लवकरच मान्सूनचे आगनम होण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. या सगळ्यातच अवकाळी पावसानेही धुमाकूळ घातला आहे.
राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वाशिम, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील नागरिकांना वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली होती. काही भाग रेड आणि ऑरेंज अलर्टच्या कक्षेत आले होते. मात्र, आता तापमानात काही अंशांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले तापमान आता ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
आज काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवत होता. त्यामुळे पावसाच्या या अंदाजामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सकाळपासूनच अनेक भागांत ढगाळ वातावरण दिसून येत असून हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवत आहे.