
Sayaji Shinde Satara heritage trees protest 2026
Sayaji Shinde News: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षदिंडीमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी शासनाच्या वृक्षतोड धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेकडो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या हेरिटेज वृक्षांची होत असलेली कत्तल ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याचे सांगत त्यांनी शासनाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पर्यावरणाला घातक ठरणारे कोणतेही प्रकल्प सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
साताऱ्यातील ४६ हेरिटेज वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांनी उभारलेल्या संघर्षाचे कौतुक करताना सयाजी शिंदे म्हणाले, “साताऱ्याला झाडे वाचवण्याचा नाद लागला आहे आणि हा नाद चांगलाच आहे. झाडे वाचवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात, ही पर्यावरणासाठी आशादायी बाब आहे.”
ते पुढे म्हणाले की, विकासाच्या नावाखाली दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीची वड, पिंपळ, उंबर यांसारखी विशाल आणि ऐतिहासिक झाडे तोडली जात आहेत. ही केवळ झाडे नसून आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि पर्यावरणाचा अमूल्य वारसा आहे. अशा झाडांची कत्तल होत असताना संबंधित यंत्रणा आणि शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
“एक झाड तोडले की पाच झाडे लावली जातील, असे सांगितले जाते. मात्र ती झाडे कुठे लावली, किती जगली आणि त्यांचे पुढे काय झाले याचा हिशोब कोणी देत नाही. केवळ आकडेवारी मांडून पर्यावरणाचे रक्षण होत नाही. प्रत्यक्षात झाडे जगली पाहिजेत,” अशा शब्दांत त्यांनी शासनावर टीका केली.
सयाजी शिंदे यांनी स्वतःच्या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, त्यांनी ‘वृक्षांचे अनाथाश्रम’ ही संकल्पना सुरू केली आहे. विविध ठिकाणी तोडली जाण्याच्या मार्गावर असलेली किंवा दुर्लक्षित झालेली झाडे आणून त्यांचे पुनर्जीवन करण्याचे काम सुरू आहे. उजाड माळरानांवर ही झाडे पुन्हा रुजवली जात असून त्यांना नवजीवन दिले जात आहे.
“शासनाला जर हे काम करता येत नसेल तर आम्हाला फोन करा. आम्ही सर्वजण मदतीला तयार आहोत. झाडे वाचवण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. आम्ही पुढील काळात ४० ते ५० हजार वृक्षांचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला आहे,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी वनविभागाची भूमिका स्पष्ट केली. विकासासाठी रस्ते आवश्यक असले तरी पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. वड, पिंपळ, उंबर यांसारख्या मोठ्या वृक्षांचे पुनर्लागवड आणि पुनर्जीवन करण्यासाठी वनविभाग विशेष यंत्रणा कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला जात असून वृक्षसंवर्धनाबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात येत असल्याचे सातपुते यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरणाच्या कामांमध्ये परवानगीपेक्षा अधिक झाडे तोडली जात नाहीत ना, यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. तसेच ज्या ठिकाणी हेरिटेज वृक्ष आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे संरक्षण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोंढवे परिसरात सुमारे ५० वटवृक्षांचे पुनर्जीवन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वनविभागाने हाती घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी काळात रस्ता रुंदीकरण किंवा विकासकामांमुळे वृक्षतोडीचा प्रश्न निर्माण झाल्यास वनविभागाचे विशेष पथक तत्काळ हस्तक्षेप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वृक्षदिंडीमध्ये पर्यावरणप्रेमी, वृक्षसंवर्धन चळवळीतील कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षा देशपांडे तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. साताऱ्यातील हेरिटेज वृक्षांचे संरक्षण, वृक्ष पुनर्जीवन आणि पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सयाजी शिंदे यांच्या स्पष्ट आणि परखड भूमिकेमुळे पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विकास आणि पर्यावरण यामधील समतोल राखण्याची जबाबदारी शासनाने अधिक संवेदनशीलतेने पार पाडावी, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.