
सातारा, दि. २१ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिलांचा लाभ कोणतीही स्पष्ट कारणे न देता बंद करण्यात आल्याचा आरोप करत सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन लाभ बंद झालेल्या सर्व महिलांना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा राजेघोरपडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातील सुमारे ९२ लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली असून, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही मोठ्या संख्येने महिलांचा समावेश असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
योजनेला २८ जून २०२४ रोजी सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत लाभार्थी संख्येत झालेल्या बदलांची सविस्तर माहिती जाहीर करावी, प्रारंभी किती महिला लाभार्थी होत्या, सध्या किती आहेत, कोणत्या कारणांमुळे किती महिलांचा लाभ बंद करण्यात आला, तसेच योजनेसंदर्भातील सर्व शासन निर्णय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
कोरेगाव तालुक्यात रंगणार तिरंगी सामना; जिल्हा बँक सोसायटी मतदारसंघांसाठी नरसिंग दिसले मैदानात
लाभ बंद होण्यामागे ई-केवायसी हे प्रमुख कारण असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत, सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करून लाभ बंद झालेल्या महिलांना तातडीने योजनेचा लाभ पूर्ववत करावा, अशी मागणी महिला काँग्रेसने केली. याशिवाय लाभ बंद करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या १२ निकषांचा फेरविचार करून सुरुवातीला ज्या सर्व महिलांना योजना मंजूर करण्यात आली होती, त्या सर्वांना पुन्हा सरसकट लाभ द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
मोर्चानंतर देण्यात आलेल्या निवेदनावेळी मनीषा साळुंखे, अनिता जाधव, मालन परळकर, उज्वला सुतार, धनश्री मालुसरे, शोभा गोळे, नाझनीन फकीर, माधवी वर्पे, अंजली कांबळे, हजरा शिकलगार, लीना सातपुते, नाजिम इनामदार, श्रीकांत कांबळे, विनय मोरे, अमोल शिंदे, ऋषिराज मोहिते, अविनाश खापे, सतीश सुतार, संतोष डांगे यांच्यासह लाभ बंद झालेल्या शेकडो महिला उपस्थित होत्या.