वाई – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी काही आश्वासने दिली आहेत. उदयनराजे यांना सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून तिकीट मिळाले आहे. त्यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेत त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
त्यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला
पुढे उदयनराजे भोसले यांनी यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द सांगितली. ते म्हणाले, दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांनी देखील देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. परकीय आक्रमणाच्या काळात त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रीपद भूषवले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे त्यामुळेच म्हटले जाते. यशवंत विचार हा लोककल्याणाचा विचार आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला पण त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत, असा टोला देखील उदयनराजे भोसले यांनी लगावला.
काँग्रेसला भारतरत्न पुरस्कार देण्याचे सुचले नाही
“एवढे मोठे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेले तरी देखील काँग्रेसला भारतरत्न पुरस्कार देण्याचे सुचले नाही. काँग्रेसला ‘आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माईंड’ हे सूत्र लागू होतं. यशवंतरावांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे कर्तव्य आम्ही पार पडणार आहोत,” असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. तसेच “काही लोकांनी स्वार्थापुरता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला, त्यांनाही यशवंतरावांना भारतरत्न द्यावा असे वाटले नाही,” अशी अप्रत्यक्ष टीका शरद पवार यांच्यावर केली. त्यांनी नाव न घेता काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली.