
शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, मुळात सत्य परिस्थिती अशी आहे की सर्वसाधारण महासभेच्या आधी महापौरांच्या दालनात, महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक होते ज्यात प्रत्येक पक्षाचे गटनेते व पदाधिकारी उपस्थित असतात आणि त्यामध्ये महासभेची भूमिका ठरवली जाते.
15 मे रोजीच्या महासभेत एकूण 233 विशेष प्रकरणे होती तसेच 1 लक्षवेधी होती. याव्यतिरिक्त सदस्यांचे प्रश्न होते. त्यावेळी सर्वानुमते सर्वात आधी लक्षवेधीवर चर्चा करण्याचे ठरले त्यानंतर प्रकरणे जास्त असल्यामुळे प्रत्येक प्रकरणावर चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. तसेच प्रश्नोत्तराचा तास घेण्याचे ठरविण्यात आले.महासभेच्या दिवशी लक्षवेधीवर चर्चा केली गेली परंतु फक्त पूर्वनियोजित हेतुपुरस्सर प्रकरणावर चर्चा करण्याचे टाळून भाजप नगरसेवकांनी प्रश्नोत्तराचा आग्रह धरला, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं.
“तर मी राजीनामा द्यायला तयार,” मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण् विखे पाटील यांचे मोठे विधान
ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रकरणांवर निर्णय घेणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे सभागृह नेता हनुमंत जगदाळे यांनी प्रकरणावर निर्णय घेण्याची विनंती केली व आपले गट मिटिंगमध्ये ठरलेले नसताना देखील आपण आग्रह का धरत आहात अशी विचारणा केली. भाजप नगरसेवकांनी यावर आम्ही सभात्याग करू, महापौरांना वेठीस धरू, महासभा चालू देणार नाही असे जोरजोरात आवाज करून वातावरण तंग करण्याचे काम केले, अशी भुमिका ठाणे शिवसेना गटाने मांडली.
मुळात भाजपच्या नगरसेवकांनी विचारलेले प्रश्न हे निविदा, शहर विकासाच्या संदर्भात भ्रष्टाचाराचा हेतू ठेवून केलेले होते आणि त्यासाठीच त्यांचा हा अट्टाहास असावा. त्यामुळे भाजपचे नगरसेवक वगळता इतर सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपच्या गोंधळास न जुमानता (भीक न घालता) लोकोपयोगी सर्व प्रकरणे मंजूर केली. त्यानंतर देखील भाजपच्या नगरसेवकांनी जेव्हा महापौरांच्या डायस समोर बसून महापौरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नियमानुसार महापौरांनी सभा संपल्याचे जाहिर केले आणि राष्ट्रगीतास सुरुवात झाली तरीदेखील भाजपचे बरेचसे नगरसेवक न उठता राष्ट्रगीताचा अवमान केला. शिवसेना मुर्दाबाद चे नारे लावले, घोषणा केल्या आणि चोराच्या उलट्या बोंबा मारून दिशाभूल करण्याच्या हेतूने मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे सिद्ध न झाल्याने नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. या सगळ्या प्रकरणावर मनोज शिंदे यांनी महापौरांना, भाजपच्या नगरसेवकांना महापौरांच्या अंगावर धाऊन जाण्याच्या प्रकरणी निलंबित करा असे पत्र दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या नगरसेवकांना योग्य तो समज द्यावा असं शिवसेनेच्या महापौरांनी निवेदनात म्हटलं आहे.