फोटो सौजन्य- सोशल मीडिया
राज्यात सध्या प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या काळात मतदान जनजागृतीहीचे ही विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. यवतमाळ मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील तब्बल 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले होते.
यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकूल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये यवतमाळ आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या सामान्य निरिक्षक ए.देवसेना, तहसीलदार योगेश देशमुख, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, सहाय्यक ट जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, नायब तहसिलदादर रुपाली बेहरे, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर गोळे, विस्तार अधिकारी पप्पू भोयर, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी विनोद डवले, प्रा.डॉ.राहुल एकबोटे आदी उपस्थित होते.
78 YAVATMAL VOTE
लोकशाही अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यावश्यक आहे. नागरिकांमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारत निवडणूक आयोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करतो.याच उपक्रमाचा भाग म्हणून आज यवतमाळ येथे विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे मतदानाबाबत जनजागृती केली. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित या उपक्रमात शहरातील विविध शाळांमधील 1,500 हून अधिक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाचे चिन्ह आणि “78 YAVATMAL VOTE” असा अनोखा आकार तयार करून लोकांना मतदानाचा संदेश दिला.
यवतमाळ येथील प्रसिद्ध गायक व अमोलकचंद महाविद्यालयातील संगीत विभागाचे प्राध्यापक डॉ.राहुल एकबोटे यांनी मतदार जनजागृतीसाठी तयार केलेल्या गिताचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या गिताचे सादरीकरण देखील यावेळी प्रा.एकबोटे यांनी केले.
या शाळांच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
कार्यक्रमात अँग्लो हिंदी हायस्कूल, लोकनायक अणे विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय,अभ्यंकर विद्यालय, वेदधारणी स्कूल, रमाबाई आंबेडकर विद्यालय, उर्दू शाळा, महिला विद्यालय, साई विद्यालय, जिल्हा परिषद स्कूलचे विद्यार्थी सहभाग झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षण जितेंद्र सातपुते, संजय कोल्हे, पंकज शेलोटकर, सचिन भेंडे, संजय सातारकर, पियुष भुरचंडी, श्री.अनवर,अजय मिरकुटे, संजय बट्टावार, संजय दंडे,अजय राऊत, मुकुंद हम्मन, मोहन शहाडे, मनीष डोळसकर यांनी सहकार्य केले.
महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर राज्यात तब्बल 9.7 कोटी मतदार असून प्रशासनाकडून मतदारांकरिता 1 लाखाहून जास्त मतदान केंद्रे उभारण्यात येत आहेत. 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.