
विठ्ठलनगरीत जिल्हा परिषदेचा दरबार, इतिहासात प्रथमच पंढरपूरातून घेणार आषाढी वारीच्या तयारीचा थेट आढावा
पंढरपूर, (वा.) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच वारी तयारीची आढावा बैठक थेट विठ्ठलनगरी पंढरपूर येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वारी व्यवस्थापनाचा आढावा घेण्याची संधी मिळणार आहे.
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी लाखो वारकऱ्यांचे आगमन होण्यापूर्वी पालखी मार्गावरील विकासकामे, मुक्काम व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधांची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विविध विषय समित्यांचे सभापती आणि सदस्य करणार आहेत. त्यानंतर पंढरपूरातच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव जि. प. अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या मंजुरीसाठी पाठविला असून, ही बैठक ३० जून रोजी होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील ही पहिली महत्त्वपूर्ण सभा ठरणार आहे. या बैठकीत आषाढी वारीपूर्व तयारीचा सखोल आढावा तसेच विकासकामांचा लेखाजोखा मांडला जाणार आहे.
Vitthal Rukmini Mandir Darshan: विठ्ठल भक्तांसाठी मोठी बातमी! मंदिर समितीकडून महत्त्वाची माहिती जारी
आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग आणि विविध शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या असून, पंढरपुरातच जिल्हा परिषदेची बैठक घेण्याचा निर्णय प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील सकारात्मक बदल मानला जात आहे. पंढरपूर शहरात प्रथमच अशा प्रकारचे आयोजन होत असल्याने या निर्णयाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून, वारी नियोजनात हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.