"हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं, तोची..."; किरण माने यांची 'छावा'वरील पोस्ट चर्चेत
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अवघ्या देशाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळावा या उद्देशाखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाचे प्रेक्षकांकडून जोरदार कौतुक केले जात आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपटाने ११ दिवसांत तब्बल ४०० कोटींची कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूडमधीलही अनेक सेलिब्रिटी चित्रपटाविषयी पोस्ट शेअर करताना दिसत आहे. दरम्यान, अभिनेता किरण माने यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता किरण मानेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत, छत्रपती संभाजी महाराजांविरोधात चुकीचे आणि अपशब्द वापरणाऱ्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी अनेकांवर चांगलीच सडकून टीका केली आहे.
एकही हिट सिनेमा नसताना उर्वशी रौतेलाची करोडोंची संपत्ती, दिमतीला आलिशान गाड्यांचा ताफा
अभिनेता किरण मानेंची जशीच्या तशी पोस्ट
तुकोबाराया म्हणतात :
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ।।
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।।
…ऐरणीवर ठेऊन, त्यावर घणाचा घाव घातला तरी जो भंग पावत नाही – फुटत नाही तोच खरा ‘हिरा’ !
…घाव सोसूनही टिकणारा तोच मौल्यवान ठरतो. हिर्यासारख्या दिसणार्या काचेचा मात्र जागेवर चुरा होतो.
…हा अभंग आठवायचं कारण म्हणजे आज छ. संभाजीराजेंसारखा शूरवीर, बदनामीच्या घणाचे घाव खाऊनसुद्धा अनमोल हिर्यासारखा तेजाने लखलखत उभा आहे, त्यांचं सत्त्व भंगलं नाही ! याउलट त्यांना बदनाम करू पहाणार्यांच्या एका दणक्यात फुटून ठिकर्या उडाल्या आहेत.
… ‘छावा’सारख्या सुंदर चित्रपटाचा भक्तपिलावळीनं प्रोपोगंडा म्हणून वापर करण्याचा हैदोस घातला आहे. पण त्याचवेळी काही अशा गोष्टी उघडकीला आल्या की भक्तांचा पर्दाफाश झाला.
एका मराठी नटानं हंबरडा फोडलावता, “औरंग्यानं शंभूराजांचा किती छळ केलाय ते पहाण्यासाठी हा सिनेमा बघा रे…” औरंग्यातर नीच होताच… पण याच नटाच्या दैवतानं मात्र छ. संभाजीराजांच्या चारित्र्याचे वाभाडे काढलेले आहेत हे समोर आलं! थोर साहित्यिक आणि कवी सावरकरांनी ‘हिंदूपदपादशाही’ या पुस्तकामध्ये संभाजीराजांची शिवरायांचा ‘शूर पण नाकर्ता पुत्र’ अशा शब्दांत बदनामी केलीय… याच पुस्तकात संभाजीराजांबद्दल ते पुढे म्हणतात, “….नेतृत्व चालविण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजीमहाराजांमध्ये रागीट स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी ह्यांच्याविषयी अत्यंत आसक्ती ह्या दुर्गुणांची भर पडली होती.” आता यावर त्या नथूरामी नटाचं काय म्हणणं आहे???
आणि एक… ‘छावा’ पाहून ‘धर्मवीर धर्मवीर’ करत छाती बडवणाऱ्या भक्त पिलावळीचे एक ‘गुरुजी’ होते ते. सरसंघचालक गोळवलकर.
तर हे गोळवलकरजी आपल्या ‘Bunch of thoughts’ या पुस्तकात लिहीतात – “Sambhaji was addicted to women and wine’… पुढे अजूनही बराच बदनामीकारक मजकूर आहे. नाटककार राम गणेश गडकरीने तर ‘राजसंन्यास’ नाटकात छ.संभाजीराजेंची अशीच भरपूर बदनामी केलेली आहे. म्हणूनच छ.संभाजी उद्यानातनं त्याचा पुतळा उखडून टाकला होता. अशा काही औरंग्याच्या अवलादी होत्या ज्यांनी शंभूराजांवर क्रूर घाव घातलेत…
आता मला सांगा, हे जे ‘छावा’ बघुन रागाने डोळे लाल करताहेत… रडून ओरडून धिंगाणा घालताहेत… ते या बदनामीवर गिळून का गप्प आहेत? असो. पण या तिघांनाही देव मानणार्यांना आज बळेबळे का होईना छ. संभाजीराजांवर प्रेम दाखवावं लागतंय. भक्तुल्ल्यांच्या दैवतांनी पुस्तकांत लिहीलेल्या शंभूराजांच्या बदनामीच्या सुरळ्या करून त्यांच्या दैवतांच्या तोंडात घुसवाव्या लागत आहेत, हे ही नसे थोडके !
४९ वर्षीय सुष्मिता सेन लग्न करणार? म्हणाली, ‘ मलाही लग्न करायचे आहे…’