
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टी सध्या नव्या वळणावर येऊन पोहोचली असून आशय, मांडणी आणि सादरीकरणाच्या चौकटी मोडत नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. बदलत्या काळानुसार मराठी सिनेमातही वेगवेगळ्या लोकेशन्सचा वापर आणि त्यानुसार कथानकाची रचना याला अधिक महत्त्व मिळू लागलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही काहीतरी वेगळं आणि दर्जेदार पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर, वेगळ्या आणि मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी ओळख असलेले दिग्दर्शक प्रकाश कुंटे आता प्रेक्षकांसाठी एक नवा कोरा कौटुंबिक चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचं नाव सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आलं असलं, तरी नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त ठाणे येथे पार पडला असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘Dhurandhar 2’ चा 19 व्या दिवशीही ऐतिहासिक विक्रम; ₹1000 कोटींची कमाई करणारा ठरला पहिला चित्रपट
या चित्रपटाची निर्मिती मानस्मिता प्रॉडक्शन आणि स्वरूप स्टुडिओज यांच्या बॅनरखाली होत आहे. डॉ. स्मिता नलावडे आणि मंगेश नलावडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर सचिन नारकर, विकास पवार आणि प्रभाकर परब सहनिर्माते म्हणून काम पाहणार आहेत. स्वरूप स्टुडिओजने यापूर्वीही अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती केली असून, त्यांच्या या नव्या प्रोजेक्टकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
चित्रपटाची कथा नितीश बुधकर यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवाद लेखन नितीश बुधकर, आदित्य प्रकाश भगत आणि विभव राजाध्यक्ष यांनी संयुक्तपणे केलं आहे. तांत्रिक बाजूही तितकीच मजबूत ठेवण्यात आली असून विव्हियन गायकवाड सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत, तर रोहित राऊत चित्रपटाला संगीत देणार आहेत. अतुल साळवे कार्यकारी निर्माता म्हणून या प्रोजेक्टशी जोडले गेले आहेत.
सोशल मीडियाला ‘उलटीचा पॉट’ म्हणत Paresh Rawal यांनी केली टीका; ‘धुरंधर 2’ वादामुळे रंगली चर्चा
विशेष म्हणजे, या चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र, दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या प्रोजेक्टबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रकाश कुंटे यांनी याआधी हाताळलेले विषय हे प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे आणि वास्तववादी होते. त्यामुळे त्यांच्या या नव्या कौटुंबिक चित्रपटातून ते कोणती वेगळी कथा मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकंदरीत, मराठी सिनेमातील नव्या प्रवाहाला पुढे नेणारा आणि आशयघनतेला प्राधान्य देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता आहे. आता फक्त चित्रपटाचं नाव आणि कलाकारांची घोषणा कधी होते, याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.