
फोटो सौजन्य - Social Media
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘शुभ श्रावणी’ सध्या प्रेक्षकांसाठी जबरदस्त नाट्यमय वळण घेऊन येत आहे. मोक्षाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस तिचं लग्न आनंदाने सुरू असताना अचानक भूतकाळातील एक धक्कादायक सत्य समोर येणार आहे. मोक्षचा एक्स बॉयफ्रेंड अचानक तिच्या आयुष्यात परत येत तिला ब्लॅकमेल करतो आणि त्यामुळे संपूर्ण लग्नसोहळ्यावर संकटाचं सावट पसरतं.
या ब्लॅकमेलिंगमुळे मोक्षा पूर्णपणे कोलमडून जाते. मानसिक तणावाच्या भरात ती आत्महत्येचा प्रयत्न करत असतानाच श्रावणी तिथे वेळेवर पोहोचते. श्रावणी मोक्षाला धीर देते, तिला समजावते आणि मन मोकळं करण्याची संधी देते. अखेर मोक्षा श्रावणीसमोर आपल्या आयुष्यातील संपूर्ण सत्य उघड करते. या कबुलीमुळे श्रावणी आणि शुभ मोक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. मोक्षाच्या एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी शुभ आणि श्रावणी त्याला गाठतात. या प्रसंगात प्रेक्षकांना शुभचा थरारक आणि जबरदस्त फाईट सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे, जो मालिकेतील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
दुसरीकडे, अलकनंदा आणि मदन नव्या अफवा पसरवतात की शुभ आणि श्रावणी पळून गेले आहेत. या अफवांमुळे लग्नात गोंधळाचं वातावरण तयार होतं. तरीही मोक्षाचे लग्नविधी सुरूच राहतात. अशा परिस्थितीत श्रावणी मोक्षाला ठामपणे सांगते की, “जे घडलं आहे ते आधी कार्तिकला सांग, आणि त्यानंतरच या लग्नासाठी उभी राहा.” सप्तपदीसाठी उभी राहताना मोक्षाला श्रावणीचे शब्द आठवतात. ती धैर्य एकवटून कार्तिकला बाजूला घेते आणि त्याच्यासमोर संपूर्ण सत्य मांडते. हे ऐकून कार्तिक तिथून निघून जातो. सर्वांना वाटतं की लग्न तुटलं आहे. मात्र, खरा प्रश्न असा आहे की आता मोक्षाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का?
याच दरम्यान लग्नातील हलकाफुलका प्रसंगही रंगतो. नवरदेवाची चप्पल चोरण्याच्या नादात चुकून अलकनंदाचीच चप्पल चोरीला जाते. त्या चप्पलेखाली अलकनंदाने विश्वंभरचा फोटो लावलेला असतो. ही चप्पल जेव्हा सगळ्यांसमोर येईल, तेव्हा कोणता नवा स्फोटक खुलासा होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. भावनिक, रोमांचक आणि नाट्यमय घटनांनी भरलेले ‘शुभ श्रावणी’चे हे भाग प्रेक्षकांनी नक्की पाहावेत. दररोज संध्या ७:०० वाजता, फक्त आणि फक्त झी मराठीवर.