“...ते तुझ्या संघर्षाचे फळ आहे”, अभिनेता किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंसाठी खास पोस्ट
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात झाला. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले या एक समाजसेविका, स्त्री मुक्ती चळवळीत सहभागी आणि देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. सावित्रीबाई फुले यांनीही महिलांसाठी प्रदीर्घ लढा दिला. शिवाय त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्याने आणि विचारांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवले. त्यांच्या जयंतीनिमित्त ‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेता किरण माने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण मानेनी खास सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्याने सावित्रीबाईंचे आचार- विचार आणि त्यांनी सहन केलेल्या गोष्टींबद्दल भाष्य केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण मानेने लिहिले की,
“ “स्त्रीने बालपणी पित्याच्या आज्ञेने आणि संमतीने वागावे. तिने कधीही स्वतःच्या मताने वागू नये. पिता, पती, पुत्र यांना सोडून स्वतंत्र राहणारी स्त्री दोन्ही कुळांना निंदनीय असते. पती हा मनाविरुद्ध वागला तरी पत्नीने प्रसन्न मुद्रेने राहावे. आपल्या पित्याने किंवा भावाने ज्याच्याशी लग्न लावले तो जिवंत असेपर्यंत त्याचीच सेवा करावी. त्याच्या मरणानंतरही तिने दुसरा नवरा करू नये. कारण लग्नामध्ये होम-हवन करुन तिला ज्याच्या ताब्यात दिले, तेच तिच्या पतीचे स्वामित्वाचे कारण आहे. पतीच तिचा मालक बनतो. त्याची आराधना व सेवा करावी पती दुर्व्यसनी असो किंवा परस्त्री गमन करणारा असो, त्याला विद्या नसली, अपंग असला तरी तिने त्याला देवासामान मानावे. स्त्रियांना पतीखेरीज दुसरा देव नाही. पतीसेवा हिच तिला स्वर्गप्राप्तीचे एकमेव साधन आहे. तिने पती निधनानंतर अल्प आहार करावा. ब्रह्मचर्य पाळावे. कारण ब्रह्मचर्यामुळे स्वर्ग मिळतो.” मनुस्मृतीतल्या पाचव्या अध्यायातल्या फक्त १४८ ते १५५ क्रमांकांच्या श्लोकांची ही झलक आहे मित्रांनो! बाकी संपूर्ण बारा अध्यायांच्या ग्रंथात, “स्त्रीचा वापर प्रजननासाठी कसा करावा… उच्चवर्णीय पुरूष जेवायला बसलेला असताना डुक्कर, कुत्रा, शूद्र, षंढ आणि रजस्वला (मासिक पाळी आलेली) स्त्री यांना त्याच्या नजरेसमोर आणू नये. उच्चवर्णीय पुरूष जेवण करून निघून गेल्यावर, जमिनीवर पडलेले उष्टे अन्न त्यांनी ‘प्रसाद’ म्हणून खावे…” अशी विकृत घाण भरलेली आहे. याच मनुस्मृतीला महात्मा फुले यांनी “स्त्रीयांना आणि शुद्रांना गुलामगिरीत लोटणारा एक नंबरचा शत्रू” म्हणून उडवून लावले… पत्नी सावित्रीबाईंना शिक्षणाचे, आचारविचारांचे पूर्ण स्वातंत्र्य दिले… याचा सावित्रीबाईंनी समाजातल्या इतर स्त्रीयांसाठी पुरेपुर उपयोग केला. मनूवाद्यांच्या जोखडात अडकलेल्या स्त्रीया आणि शूद्रातिशूद्रांना मुक्त करण्यासाठी पतीसोबत घर सोडले. मनूवाद्यांच्या अर्वाच्य ट्रोलिंगला जुमानले नाही. शेण, दगडगोट्यांचा मारा झेलला… मागे हटल्या नाहीत ! आई, तुझे आभार कसे मानू? कुठल्या शब्दांत मानू? तुला त्रास देणार्या मनूवादी लोकांची पिलावळ आज विद्येची देवता म्हणुन सरस्वती देवीला पुजते… पण तुझी मात्र ते आजही हेटाळणी करतात. खरंतर त्यांच्या घरातल्या महिलाही आज ज्या स्वातंत्र्याचा, शिक्षणाचा उपयोग करून घेत आत्मसन्मानानं जगताहेत, ते तुझ्या संघर्षाचं फळ आहे ! या देशातलं खरं विद्येचं, ज्ञानाचं प्रतिक तू आहेस. तुझे विचार, तुझा संघर्ष घराघरातल्या मुलामुलींना शिकवायला हवा… सावित्रीआई, तुला लै लै लै प्रेम… आणि एक घट्ट मिठी.”
‘टाईमपास’मधल्या दगडूचे फिल्म इंडस्ट्रीत बेधडक ११ वर्षे, प्रथमेश परबने शेअर केली स्पेशल पोस्ट