मान्सून आला, पण विकासकामे रखडली! नवी मुंबईकरांना पुन्हा गैरसोयींचा सामना?
नवी मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असले तरी शहरातील अनेक विकासकामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः रस्ते दुरुस्ती, काँक्रीटीकरण, गटारांची कामे, पदपथांची उभारणी आणि रस्त्यालगत सुरू असलेली विविध कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत.
त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहरातील सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी १५ मे ही अंतिम मुदत निश्चित केली होती.
संबंधित विभागांना वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. मात्र, ही मुदत उलटून गेल्यानंतरही अनेक ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर आणि कामकाजाच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर खडीचे ढिगारे, उघडे खड्डे, अर्धवट बांधकाम आणि खोदकाम केलेले भाग अद्याप तसेच आहेत. काही ठिकाणी पदपथांची कामे सुरू असून ती पूर्ण झालेली नाहीत. तर काही ठिकाणी गटारांची साफसफाई आणि दुरुस्तीची कामेही अपुरी राहिली आहेत.
पावसाचे पाणी साचल्यास या सर्व अपूर्ण कामांचा फटका थेट नागरिकांनाच बसणार आहे. मात्र येत्या पावसाळ्यात नवी मुंबईकरांना दिलासा मिळणार की पुन्हा एकदा अपूर्ण विकासकामांचा त्रास सहन करावा लागणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.