
Aditya Thackeray : विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; आदित्य ठाकरे यांचे पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटीविरोधात राज्यभर झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. शासनाने विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही नोटिसा बजावल्या जात आहेत आणि काही प्रकरणांमध्ये तपास सुरू असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्यावर अशा प्रकरणांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाची राज्यभर एकसमान आणि तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी निश्चित कार्यपद्धती आणि कालमर्यादा जाहीर करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.
पत्रामध्ये त्यांनी सात महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. गृहविभागाच्या निर्देशांचा लाभ राज्यातील सर्व विद्यार्थी आंदोलनांशी संबंधित गुन्हे, एफआयआर आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांना लागू होणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच भारतीय न्याय संहिता किंवा इतर कायद्यांतर्गत नोटिसा बजावण्यात आलेल्या अथवा तपास सुरू असलेल्या विद्यार्थ्यांवरील पुढील तपास आणि दंडात्मक कारवाई तात्पुरती स्थगित केली जाणार का, याबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मागितली आहे.
अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून महायुतीत खळबळ? बच्चू कडू, संजय शिरसाट यांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी
याशिवाय गुन्हे मागे घेण्याची अधिकृत प्रक्रिया काय असेल, संबंधित पोलीस ठाणे स्वतःहून प्रस्ताव पाठवणार की विद्यार्थी अथवा त्यांच्या वकिलांना स्वतंत्र अर्ज करावा लागणार, याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांबाबत सरकारी अभियोक्त्यामार्फत अर्ज दाखल केला जाणार का आणि त्यासाठी कोणती कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, याचाही त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे.
राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि पोलीस ठाण्यांना यासंदर्भात एकसमान परिपत्रक किंवा मानक कार्यपद्धती (SOP) जारी करण्यात आली आहे का, तसेच ती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांवर अद्याप अटक, चौकशी, हजेरी किंवा इतर कोणत्याही प्रकारची कारवाई सुरू आहे, त्यांच्याबाबत तातडीने स्पष्ट निर्देश देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
‘राज ठाकरेंच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची गरज’; अमित साटमांचा जोरदार पलटवार
नीट पेपरफुटी आंदोलनानंतर विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा शासनाचा निर्णय प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविला गेला पाहिजे. केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता राज्यातील प्रत्येक संबंधित विद्यार्थ्याला त्याचा लाभ मिळावा, यासाठी पोलीस प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.