
मी कार्याध्यक्ष होणार असल्याच्या अफवा; आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाऊ शकते. येत्या 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व वृत्तावर आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण देत मी कार्याध्यक्ष होणार असल्याच्या अफवा असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी २००३ मध्ये उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने कार्याध्यक्षपद देण्यात आले होते, त्याच धर्तीवर आदित्य यांची नियुक्ती होऊ शकते, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. यासाठी लवकरच कार्यकारिणीची बैठक बोलावून प्रस्ताव मंजूर करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही वर्षांत आदित्य यांनी संघटनात्मक पातळीपासून ते निवडणूक व्यवस्थापनापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे त्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी पक्षातील काही नेत्यांकडून होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवी उभारी मिळेल आणि नव्या पिढीचे नेतृत्व पुढे येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटात मोठी जबाबदारी मिळण्याच्या चर्चावर पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. काही माध्यमात त्यांना पक्षाचा कार्याध्यक्ष करण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. मात्र, या सर्व चर्चा निराधार असून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आदित्य यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर पोस्टही केली
यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, मला पक्षात कोणते पद दिले जाणार असल्याची बातमी चुकीची आहे. अशा प्रकारची कोणतीही चर्चा पक्षात झालेली नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
अधिकारांचे केंद्रीकरण; हळूहळू सर्व सूत्रे देणार
दरम्यान, हा निर्णय झाल्यास पक्षातील अधिकारांचे केंद्रीकरण आदित्य ठाकरे यांच्याकडे होण्यास सुरुवात होईल. तसेच खासगीत नेते काय बोलतात ते निरर्थक असते. आदित्यबद्दल खासगीत नेते काय बोलतात, याला अर्थ नसतो. उद्धव ठाकरे हेही पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. आदित्य यांचे नाव आपल्या माध्यमातून समोर आले असेल, तर स्वागत केले पाहिजे. तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पुढील राजकारण तरुणांच्या हाती गेले पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Pune Rain News : दोन दिवसाच्या अवकाळीने पुणं तुंबलं! खरं कारण काय? आदित्य ठाकरेंनी केला पर्दाफाश