
मतदार ओळखपत्र खरंच रद्द होणार का? निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण खुलासा
पुणे : ‘विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026’ दरम्यान कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने मतदार ओळखपत्र रद्द होणार असल्याचा दावा करणारा संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा संदेश पूर्णपणे खोटा असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या या संदेशात मतदारांच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तातडीने संपर्क न केल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाईल आणि मतदार ओळखपत्र रद्द होईल, असे सांगण्यात आले आहे. या संदेशासोबत भारतीय निवडणूक आयोगाचा लोगो आणि मोबाईल क्रमांक देण्यात आल्याने अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोगाने फेटाळला दावा
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या व्हायरल संदेशाची दखल घेत स्पष्टीकरण दिले आहे. अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले की, भारत निवडणूक आयोग किंवा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी असा कोणताही संदेश अथवा व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केलेला नाही.
संशयास्पद संदेशाला प्रतिसाद देऊ नये
निवडणूक आयोग मतदारांना वैयक्तिक संदेश पाठवून कागदपत्रांची मागणी करत नाही किंवा मतदार ओळखपत्र रद्द करण्याची धमकी देत नाही. व्हायरल संदेशातील भाषा आणि अधिकाऱ्यांचा उल्लेख हा अधिकृत प्रक्रियेशी सुसंगत नसल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे. हा संदेश सायबर फसवणुकीचा भाग असण्याची शक्यता असून, नागरिकांनी अशा कोणत्याही संशयास्पद संदेशाला प्रतिसाद देऊ नये. तसेच आपली वैयक्तिक माहिती किंवा कागदपत्रांची माहिती अनोळखी क्रमांकावर शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाटण मतदारसंघात ‘एसआयआर’ (SIR) मोहीम
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार याद्यांचे शुद्धीकरण, अद्ययावतीकरण व त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम २०२६ जाहीर केला आहे. महाराष्ट्रात या मोहिमेस २० जूनपासून सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, नव्या पात्र मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह बनविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.