स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट वेगळा दाखलवल्याबाबत अमोल कोल्हेंने व्हिडिओ जारी करुन स्पष्टीकरण दिले (फोटो - सोशल मीडिया)
शिरुर : सध्या बॉक्स ऑफिसवर अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा छावा चित्रपट धुमाकूळ घालतो आहे. मात्र या चित्रपटावरुन जोरदार टीका टिप्पणी आणि राजकारण देखील रंगताना दिसत आहे. या चित्रपटावर शिर्केंच्या वारसदारांनी आक्षेप घेतल्यानंतर संभाजी ब्रिगेडने देखील आक्षेप घेतला आहे. याचबरोबर खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांच्या मालिकेची देखील चर्चा रंगली आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये दाखवलेल्या शेवटावरुन राजकारण रंगलं आहे. याबाबत जेष्ठ नेते शरद पवार यांनी काही सूचना दिल्या होत्या का? यावर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांवरील बलिदानाचा पूर्ण प्रसंग दाखवण्यात आला आहे. मात्र अमोल कोल्हे यांच्या स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये हे सर्व प्रसंग दाखवण्यात आले नाहीत. हे न दाखवण्यामागे राजकारण असल्याचा आरोप केला जात होता. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे खासदार असल्यामुळे शरद पवार यांनी काही सूचना दिल्या असल्याची चर्चा देखील रंगली होती. याबाबत आता अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन आपले मत मांडले आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का? यामध्ये काही राजकीय हेतू होता का? आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ महाराजांचा अंत न दाखविण्यामागे शरद पवारांची काही विशेष सूचना होती का? अशा प्रश्नांची उत्तर खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहेत. माझ्यावर आणि माझ्या टीमवर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट दाखवण्याबाबत दबाव होता अशी कबुली देखील अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपून आता पाच वर्षांहून अधिकचा काळ झाला. तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. या यशात चाहत्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सध्या थिएटरमध्ये असलेला छावा चित्रपट अतिशय उत्तम आहे. तो पाहण्याचे मी आवाहन केलेले आहेच. यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अनेक वर्ष दडवलेला इतिहास समोर येत आहे. अंधाऱ्या कोठडीत डांबला गेलेला इतिहास यानिमित्ताने उजळून निघाला. पण सोशल मीडियावर काही ठराविक अंधभक्तांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या हेतूविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मी या ट्रोलर्सना फारशी किंमत देत नाही. पण मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळे उत्तर देणे भाग वाटते,” असे स्पष्ट मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेचा शेवट आणि दबाव!
नेमकं काय घडलं होतं ?#swarajyarakshaksambhaji #chatrapatisambhajimaharaj #chhava #Swarajyarakshak #SambhajiMaharajhttps://t.co/hjlBNzzK2Ahttps://t.co/P5YLSdAL1G— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 25, 2025
पुढे ते म्हणाले की, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखविण्याचा माझ्यावर दबाव होता, मात्र माझ्या टीमवर आणि माझ्यावर हा दबाव माध्यमांचा होता. कारण सदर मालिका टेलिव्हिजनवर प्रसारित होत होती. त्यामुळे रेग्युलेटरी बॉडीकडून काही मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे हिंसाचार किती प्रमाणात दाखवावा, रक्त किती दाखवले जावे, याचे काही नियम असतात. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून मालिकेचा शेवट दाखविण्यात आल्याचे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मालिकेबाबत काही सूचना दिल्या असल्याची चर्चा देखील सुरु होती. याबाबत खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “शरद पवार यांनी कधीही अमुक प्रसंग असा दाखवा किंवा तसा दाखवू नका, याबद्दल एका शब्दानीही सांगितलेले नव्हते. किंबहुना शरद पवार यांनी तेव्हा मालिका पाहिलेलीच नव्हती. करोना काळात जेव्हा मालिकेचे पुन्हा प्रसारण करण्यात आले, तेव्हा शरद पवार यांनी पहिल्यांदा संपूर्ण मालिका पाहिली. त्यामुळे कुणाला तरी खूश करण्यासाठी मालिकेचा शेवट बदलला, हा धादांत खोटा प्रचार आहे,” असे स्पष्ट मत खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.