
शरद पवार गट फुटीच्या चर्चेवरून अनिल देशमुखांचा धर्मरावबाबा आत्रामांवर निशाणा
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या पक्षफुटी आणि पक्षांतरांच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदारांच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातही संभाव्य फुटीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या दाव्यावर आमदार अनिल देशमुख यांनी जोरदार पलटवार केला आहे.
धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटातील काही खासदार आणि आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात, असा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावरून आत्राम यांच्यावर टीकेची झोड उठवली.
पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार फुटणार असल्याचे तथ्यहीन वक्तव्य डुप्लिकेट #NCP चे नेते बाबा आत्राम यांनी केले आहे. हे वक्तव्य पूर्णतः निराधार आहे. बाबा आत्राम यांची मुलगी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहे. आत्राम यांनी आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवावे आणि मग आमदार… — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 19, 2026
देशमुख म्हणाले, “पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार फुटणार असल्याचे तथ्यहीन वक्तव्य डुप्लिकेट NCP चे नेते बाबा आत्राम यांनी केले आहे. हे विधान पूर्णपणे निराधार आहे. बाबा आत्राम यांची मुलगी आजही पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहे. त्यांनी आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवावे आणि मग आमदार-खासदार फोडण्याच्या बाता माराव्यात.” या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
माध्यमांशी बोलताना धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक मजबूत होत असल्याचा दावा केला. पक्षात माजी खासदार आणि आमदार प्रवेश करत असून भविष्यात विद्यमान खासदार-आमदारही पक्षात येऊ शकतात, असे ते म्हणाले.
आत्राम यांनी पुढे दावा केला की, “आम्ही कोणतेही ऑपरेशन करणार नाही. ऑपरेशन तुतारीवालेच करतील. तुतारीचे पाच खासदार आमच्या पक्षात येऊ शकतात. विकासासाठी आणि पुढील निवडणुकांमध्ये टिकून राहण्यासाठी अनेकांना सत्तेसोबत राहण्याची गरज वाटत आहे.” तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास वाढत असल्याचाही दावा त्यांनी केला.
शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसमधील अलीकडील घडामोडींनंतर महाराष्ट्रातही विविध पक्षांतील संभाव्य फुटीच्या चर्चांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत धर्मराव बाबा आत्राम आणि अनिल देशमुख यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. पुढील काही महिन्यांत प्रत्यक्षात कोणते राजकीय बदल घडतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.