
भाजपचा 'प्लॅन' यशस्वी ?
अमरावती : महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या अगदी पूर्वसंध्येला राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजप, युवा स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय खेळीमुळे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अनिश्चितता निर्माण झाली आहे. भाजपचा महापौरपदावरील विजय मात्र जवळपास निश्चित मानला जात आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. त्याआधीच राजकीय समीकरणे रंगतदार वळणावर पोहोचली आहेत. महापौरपदासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्यांच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे भाजपचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. मात्र, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत चित्र वेगळे दिसत आहे. भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाने सव्वा-सव्वा वर्षांच्या सूत्रावर सहमती दर्शवत महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. युवा स्वाभिमान पक्षाने उपमहापौरपदासाठी आपला उमेदवार घोषित केला आहे. भाजपकडूनही त्याला पाठिंबा अपेक्षित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि युवा स्वाभिमान पक्ष हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असल्याने, राष्ट्रवादी उपमहापौरपदासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देईल की नाही? याबाबत मोठी साशंकता आहे. राष्ट्रवादीने भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असला, तरी उपमहापौरपदाबाबत त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. युवा स्वाभिमान पक्षालाही या राजकीय गणिताची पूर्ण जाणीव आहे.
भाजपचा सत्ता मिळवण्याचा मार्ग सुकर
भाजपने एका दगडात दोन शिकार मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापौरपदाचा विजय निश्चित करून भाजपने सत्ता मिळवण्याचा मार्ग सुकर केला आहे. दुसरीकडे दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना आमनेसामने उभे करून राजकीय डावपेच यशस्वीपणे खेळल्याचे मानले जात आहे. आता सर्वांचे लक्ष उपमहापौरपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित) ची भूमिका निवडणुकीचा निकाल निर्णायक ठरणार आहे.
हेदेखील वाचा : अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस