अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस (फोटो सौजन्य-Gemini)
ZP Election 2026 News In Marathi: धाराशिव तालुक्यातील बेंबळी जिल्हा परिषद गटात यंदाची निवडणूक बहुकोनी आणि चुरशीची ठरली असून अपक्ष उमेदवारांच्या आक्रमक प्रचारामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे महेंद्र धुरगुडे हे मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सलमान शेख आणि शिवसेना (उबाठा) चे विनय शेळके हे प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत.
या तिन्ही प्रमुख उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपाचे निष्ठावंत भगीरथ लोमटे आणि शिवसेनेचे निष्ठावंत अनिल हेड्डा हे दोघेही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून ते आपापल्या मूळ पक्षांची मते खेचत आहेत. त्यामुळे घड्याळ, पंजा आणि मशाल या तिन्ही चिन्हांचे उमेदवार अडचणीत आले असल्याचे चित्र आहे.
महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याने भाजपातील अनेक इच्छुकांना उमेदवारी मागे घ्यावी लागली होती. माजी जिल्हा परिषद सदस्यांचे पती राजाराम कोळगे, माजी जिप सदस्य रामदास कोळगे, पंचायत समितीचे माजी सभापती नाना कदम, भाजपाचे माजी लोकसभा समन्वयक पांडुरंग पवार आदींची प्रबळ दावेदारी होती. मात्र संधी न मिळाल्याने भाजपातील ही नाराज मंडळी नेमकी कोणाच्या बाजूने झुकतात, यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.
दुसरीकडे, शिवसेनेत स्थानिक कार्यकर्त्यास उमेदवारी न दिल्याच्या नाराजीतून अनिल हेड्डा यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून त्यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. त्याचप्रमाणे भाजपातील बंडखोर उमेदवार भगीरथ लोमटे यांनीही ‘स्थानिक कार्यकर्त्याला डावलण्यात आले’ हाच मुद्दा पुढे करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. हे दोन्ही अपक्ष उमेदवार आपल्या मूळ पक्षांना किती नुकसान पोहोचवतात, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या गटात एकमेकांविरोधात असल्याने दोन्ही उमेदवार परस्परांची मते खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी एकमेकांचा पराभव करण्याच्या नादात तिसऱ्या उमेदवाराला अप्रत्यक्ष फायदा होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
या गटात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असून धनगर समाजाचे मतदानही तुल्यबळ आहे. दलित व ओबीसी मतदार निर्णायक ठरणार आहेत, तर मराठा समाजाचे मतदान ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचा एकमेव उमेदवार मैदानात असल्याने मुस्लिम, दलित आणि अन्य घटकांची मते एकवटण्यात तो यशस्वी ठरल्यास काँग्रेसला फायदा होऊ शकतो. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी परस्पर मतांवर कुरघोडी केल्यास त्याचा थेट लाभ राष्ट्रवादीला होण्याची चिन्हे दिसत आहेत.






