
Satara ZP Election 2026, BJP Strategy Satara, NCP Rebellion Satara,
Satara ZP: सातारा जिल्हा परिषदेत सभापती पदांच्या निवडीनंतर राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टीच्या चार सभापती निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनामध्ये झालेल्या कथित फुटीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
“सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपला थेट आव्हान दिलं असून, शंभूराज देसाई यांनीही 20 मार्चच्या घटनांवरून संताप व्यक्त केला आहे.”
सभापती निवडीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष सदस्यांनी एकत्र येत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. काळ्या फिती बांधून सदस्यांनी निषेध नोंदवत “लोकशाहीचा गळा घोटला जात आहे” अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना मकरंद पाटील यांनी थेट इशारा देत म्हटले, “राजकारणात आमचे सदस्य फोडण्याची सुरुवात त्यांनी केली आहे, पण शेवट आम्ही करणार. आम्ही काल-परवा राजकारणात आलेलो नाही. आमच्या पन्नास वर्षांच्या पिढ्या या राजकारणात काम करत आहेत.”
पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांनी एकत्र येत सभागृहात प्रश्न उपस्थित केले असून, कराडमध्ये सर्वपक्षीय निषेध नोंदवण्यात आला आहे. “ही केवळ एका पक्षाची लढाई नसून लोकशाही वाचवण्याची लढाई आहे.” दरम्यान, संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितल्याचे सांगत, “कोर्टाने प्रशासनावर ओढलेले ताशेरे हा आमचा नैतिक विजय आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
याच वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “20 मार्च रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीदरम्यान जे प्रकार घडले ते अत्यंत गंभीर होते. भाजपने बळाचा आणि दांडीलशाहीचा वापर करून निवडणूक पार पाडली,” असा आरोप त्यांनी केला.
शंभुराज देसाई म्हणाले, “साताऱ्यासारख्या जिल्ह्यात पहिल्यांदाच सदस्यांना हाताला काळ्या फिती बांधून निषेध करावा लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सदस्यांवर अन्याय झाला तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि हा लढा सुरूच ठेवू.” दरम्यान, 20 मार्चच्या घटनांचा निषेध करत विरोधी सदस्यांनी सभागृहासमोर काळ्या फिती बांधून आंदोलन केले. या घटनांमुळे साताऱ्यातील जिल्हा परिषद राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांतील संघर्ष उघडपणे समोर आला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या संघर्षाचे पडसाद आगामी निवडणुकांवर उमटण्याची शक्यता असून साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधकांनी दिलेला इशारा आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका यामुळे येत्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.