
'देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, ते सर्वगुणसंपन्न', चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव
भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात आयोजित ‘देवभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी फडणवीस यांना “दैवी शक्ती लाभली आहे” असे संबोधत त्यांच्या नेतृत्वशैलीचे आणि निर्णयक्षमतेचे कौतुक केले.
आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते महापौर झाले आणि पुढे राज्य महापौर परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. स्वतःची प्रकृती ठीक नसतानाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा उल्लेख करत त्यांनी फडणवीस यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांना दैवी शक्ती लाभली आहे. ते सर्व बाबतीत सर्वगुणसंपन्न आहेत. अनेक मुख्यमंत्री पाहिले, मात्र फडणवीस यांच्यासारखी निर्णयक्षमता क्वचितच पाहायला मिळते.” त्यांनी पुढे असा दावाही केला की, फडणवीस अनेक महत्त्वाच्या विकासकामांवरील प्रस्तावांवर तत्काळ निर्णय घेतात आणि निधी मंजुरीसारख्या प्रक्रियेतही विलंब होऊ देत नाहीत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, मराठा आरक्षणासाठी आवश्यक असलेला अभ्यास आणि कायदेशीर तयारी फडणवीस यांनी केली होती, त्यामुळे ते उच्च न्यायालयात टिकू शकले. मात्र, पुढील काळात परिस्थिती बदलल्याने आरक्षण कायम राहू शकले नाही. याबाबत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका न करता, कोविड महामारीमुळे त्या काळात वेगळ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, असे मत व्यक्त केले.
कर्जमाफीच्या निर्णयाचाही उल्लेख करत त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पहाटेपर्यंत बैठका घेऊन धोरणे अंतिम करण्याची त्यांची कार्यपद्धती इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महायुतीत वाढणार संघर्ष? क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा
यापूर्वी दिल्लीतील आंदोलनस्थळी पोलिसांकडून दगडांवरील फिंगरप्रिंट तपासले जात असल्याच्या त्यांच्या विधानावरून विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर आता फडणवीसांना “दैवी शक्ती” लाभल्याच्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.