
Ajit Pawar Plane Crash Investigation, Devendra Fadnavis, Rohit Pawar Allegations,
CM Devendra Fadnavis News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. भाजपनेही अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी या प्रकरणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही बोललो आहे. जर कोणाला काही शंका असेल तर त्यांनी डीजीसीए किंवा आम्हाला कळवावे; त्यांचा नक्कीच विचार केला जाईल.’ अशी प्रतिक्रीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील उपस्थित होते. (Ajit Pawar Plane Crash )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघातामागचे सत्य समोर यावे, अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. जर माझ्या कार्यालातही कोण लाच घेत असेल तर मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत. लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत; अन्यथा, आम्ही त्यांनाही राजीनामा देण्यास सांगितले असते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात गरिबांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, अल्पसंख्याक शाळा मंजुरी प्रकरणाची चौकशी सुनेत्रा पवार यांच्या अधिकारक्षेत्रात सुरू आहे. या प्रकरणात जे काही सत्य असेल ते ते उघड करतील, असेही फडणवीस यांनी नमुद केले.
गेल्या महिन्यात २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणावरून राजकीय वादळ उठले आहे. अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) नेते रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी या अपघाताबाबत गंभीर संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे.
रोहित पवार यांनी या अपघातामागील परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. “जोपर्यंत या घटनेची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. ज्या कंपनीचे (VSR) ‘लिअरजेट ४५’ विमान कोसळले, त्या कंपनीच्या मालकांचे मंत्र्यांशी असलेल्या कथित संबंधांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणावर भूमिका मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. संबंधित कंपनीच्या (VSR) सर्व लॉगबुकची आणि कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. “मी स्वतः अनेकदा याच कंपनीच्या विमानातून प्रवास केला आहे. सर्व राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी या अपघाताचे नेमके कारण समोर येणे आवश्यक आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची विनंती केली असून, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. यावर बोलताना फडणवीस यांनी शरद पवार गटाच्या अनुपस्थितीवर निशाणा साधला. अधिवेशनात अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा विरोधकांकडून आक्रमकपणे मांडला जाण्याची शक्यता आहे.
२८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळ विमान उतरवण्याच्या प्रयत्नात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.