'मिमिक्री आर्टिस्ट असते तर स्टँडअप कॉमेडियनना मार्केटच राहिलं नसतं'; फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला
राज्यात गेल्या चार दिवसांपासून मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. प्रकल्पावरील दरड दुर्घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतून विरोधकांवर हल्लाबोल करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
मिसिंग लिंक प्रकरणावरून सुरू झालेल्या टीकेदरम्यान फडणवीस म्हणाले, “एकवेळ माझा अपमान करा, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही.” यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करत, “मिसिंग लिंकवर बोलल्याने तुमचा अपमान कसा झाला?” असा सवाल उपस्थित केला होता. तसेच, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून हिंदीत का बोलता?” अशीही टीका त्यांनी केली होती.
विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मिसिंग लिंक संदर्भात ७ हजार कोटी पाण्यात गेले, असे खोटे दावे करणे हा माझा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे.” खोट्या बातम्या पसरवून राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी हिंदी भाषेवरून केलेल्या टीकेलाही फडणवीसांनी उत्तर दिले. हिंदीत एक वाक्य बोललो, कारण ज्यांना समजायला हवे त्यांच्यासाठी बोललो. पण दुसऱ्यालाच मिरची lलागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, “भाडे टट्टू” या शब्दाऐवजी आता “भाटक गदर्भ” हा अधिक सुसंस्कृत शब्द वापरत असल्याचे सांगत, “तरीही कोणाला समजलं नसेल तर सुपारीबाज…” असा टोला त्यांनी लगावला.
ते म्हणाले, “त्या ठिकाणी मी हिंदीमध्ये बोललो “भाडे के टट्टू” काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं म्हणून… नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे “भाटक गदर्भ” म्हणतो. जर कोणाला समजलं नसेल तर मग “सुपारीबाज”… पण मी तर काही सुपारी बाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती अनेकांना का लागली मला समजलच नाही… अनेक लोकांना ती लागली. बर ते जाऊ द्या आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो आता ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो त्यांच्या दुसऱ्यालाच मिरची लागली आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले पूर्ण भाषा मराठीतच केलं.”
राज ठाकरे यांच्यावर उपरोधिक टिप्पणी करत मुख्यमंत्री म्हणाले, “ते आमचे मित्र आहेत. राजकारणात आम्हाला त्यांच्यापासून काही धोका नाही. पण ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते, तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं.”
फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला. मिसिंग लिंक प्रकरणावरून सुरू झालेली राजकीय शाब्दिक चकमक आता अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.






