
Eknath Shinde instructed Shivsena leaders not to withdraw application of Kokan Vidhan Parishad Candidature,
राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून कोकणातील विधान परिषद मतदारसंघावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुतीच्या जागावाटपात कोकण मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली होती. अनिकेत तटकरे या जागेवरून अर्ज देखील दाखल करणार असल्याचे निश्चित झाले आहे. अश्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातल्या आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत युतीधर्म पाळण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. आता मात्र यात नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून ‘ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांनी ४ जून पर्यंत मागे घेऊ नयेत’ अश्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
एकीकडे तातडीची बैठक घेत युतीधर्म पाळण्याचे आवाहन आणि त्याच बैठकीत भरलेले उमेदवारी अर्ज मागे न घेण्याबाबतच्या सूचना यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण मतदारसंघाबाबत शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरु राहणार असल्याचे समजते. कोकणच्या विधान परिषद उमेदवारीसाठी अनिकेत तटकरे यांचे नाव निश्चित झाले असून ते उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार असल्याचे समजत आहे. यावरून महायुतीत कोकणातील इतर नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लग्नल्या. कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळे शिवसेनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवत ‘शिवसेनेच्या आमदारांनी युतीधर्म पाळावा.’ अश्या सूचना दिल्या.
कोकणच्या जागेवरून उद्भवलेल्या वादावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा अर्ज दाखल करण्यास शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीत आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार निलेश राणे आणि मंत्री भरत गोगावले हे उपस्थित होते. कोकणची जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळे शिवसेना आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी संयम पाळावा अश्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. विधान परिषदेची कोकणातील जागा हि अनिकेत तटकरे हे लढवणार असल्याचे निश्चित समजले जात होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी ‘ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांनी ४ जून पर्यंत मागे घेऊ नयेत’ अश्या सूचना दिल्यामुळे महायुतीत नक्की काय घडतंय असा प्रश उपस्थित केला जात आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विधानपरिषद मतदारसंघात शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे हि जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही होते. मंत्री भारत गोगावले यांनी या मतदारसंघासाठी त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. तसेच, आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे आता त्यांनी दाखल केलेले अर्ज ४ जूनपर्यंत मागे न घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
या जागावाटपात भाजपला सर्वाधिक अकरा जागा, शिवसेना शिंदे गटाला चार जागा तर राष्ट्र्वादी काँग्रेसला दोन जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सात जागांवर असून बसलेल्या शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे तर राष्ट्रवादिला मात्र अतिरिक्त एक जागा पदरात पडून घेण्यास यश मिळाले आहे. यात कोकण विभागाची एक जागा समाविष्ट आहे. म्हणूनच अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या भेटीवरून त्यांचे नाव जवळपास निश्चित समजले जात आहे. सोमवारी (१ जून) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याआधीच अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.