
'जिवंतपणीही सुरक्षितता नाही, मृत्यूनंतरही नाही'; अंत्यसंस्कार सुरू असतानाच स्मशानभूमीतील चिमणी कोसळली, शिवसेनेचा MBMC ला इशारा
या घटनेमुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षेविषयीच्या दाव्यांचा फोलपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात उघडी चेंबर्स, खड्डेमय रस्ते, मोडकळीस आलेल्या सार्वजनिक सुविधा, धोकादायक इमारती आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना आता स्मशानभूमीसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणीही सुरक्षिततेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.
MIRA BHAYANDAR: काशिमीरा परिसरात पार्किंगच्या वादातून गुंडगिरी; तरुण आणि आईवर जीवघेणा हल्ला
या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेचा तीव्र निषेध करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “मीरा-भाईंदरमध्ये नागरिकांच्या जीवाची कोणतीही किंमत राहिलेली नाही. जिवंत असताना नागरिकांना रस्ते, चेंबर्स, इमारती आणि विविध धोकादायक परिस्थितींना सामोरे जावे लागत आहे. आता मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर यापेक्षा मोठे प्रशासनाचे अपयश कोणते? महापालिकेचा हा हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा आम्ही अजिबात सहन करणार नाही.”
पदाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, स्मशानभूमीतील सर्व संरचनांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी आणि शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा तपासणी तात्काळ करण्यात यावी. अन्यथा शिवसेना जनतेसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
या घटनेमुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली, तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
MIRA BHAYNDAR : मिरा-भाईंदरमध्ये पावसाचा कहर; आपत्ती व्यवस्थापन विभागावर प्रश्नचिन्ह