
पुण्यात भाजपला बसणार धक्का; माजी शहर उपाध्यक्ष अमराळे करणार राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे : सध्या महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने अनेक निष्ठावंताना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे काही जणांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. अशातच आता पुण्यात भाजपला आणखी एक धक्का बसणार आहे. गेली २५ वर्षे भाजपमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेले व वेगवेगळ्या उपक्रमांमधून स्वतःची ओळख निर्माण करणारे पुणे शहर भाजप माजी उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अमराळे यांनी फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे.
अमराळे यांनी २०१२ मध्ये महापालिका निवडणूक लढवली होती. काही मताने त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून त्यांना महानगरपालिका व विधानसभेसाठी भाजपकडून डावलले आहे. २०२६ च्या निवडणुकीत सुद्धा त्यांना प्रभाग १२ (छ शिवाजीनगर मॉडेल कॉलनी) मधे त्यांना डावलण्यात आले आहे. या ठिकाणी सर्वसाधारण गटात महिला उमेदवार देवून अमराळे यांच्यावर मोठा अन्याय केला गेला आणि हे सर्व एका नेत्याने जाणीवपूर्वक घडवून आणले असे अमराळे यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : हेच बघायचं बाकी होतं! भाजप-काँग्रेस युती, शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवलं? अंबरनाथमध्ये राजकीय उलथापालथ
गेली २५ वर्ष सातत्याने या भागात त्यांनी देश-परदेशात ५५ यात्रांचे आयोजन केलेले आहे. त्यातून ३५००० नागरिकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला आहे. मोठ्या संख्येने हळदी कुंकू, रक्षाबंधन, कोजागिरी असे समारंभ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ३००० हून अधिक नागरिकांना व पोलिस बांधवांना वेगवेगळ्या पुरस्काराने त्यांनी सन्मानित केले आहे. पालखी मार्गावर निर्मल वारी अभियान यशस्वी करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. दैनंदिन नागरिकांच्या अडचणी सोडवत असल्याने आणि नम्र व प्रेमळ स्वभावामुळे त्यांची मोठी लोकप्रियता या भागात असल्याचे दिसून येते. यामधून स्वतःची मोठी वोट बँक त्यांनी निर्माण केलेली आहे.
अमराळे यांच्या या निर्णयाने प्रभाग १२ च्या निकालावर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात आल्याने राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना पक्षात घेण्यासाठी मुख्य नेत्यांकडून मोठे प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी सायंकाळी होणार पक्ष प्रवेश
अमराळे यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मी भाजपमध्ये 25 वर्षापासून काम केलं, विधानसभा निवडणुकीतही मला डावलले, आता महापालिका निवडणुकीसाठीही स्थानिक नेत्यानी डावलले. 2012 पासून मी राजकारणातून कसा संपेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्या कार्याची दखल घेऊन पक्षात प्रवेश देण्यासाठी माझ्या प्रभागात येत आहे. याचा मला आनंद आहे. माझं जनतेतील काम अजित पवारांनी ओळखलं पण इतके वर्ष भाजपमध्ये राहून भाजपच्या स्थानिक नेत्यांना समजलं नाही. अजित पवार दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आज 6 वाजता अजितदादांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.