
'अजित पवारांच्या अपघातप्रकरणाचा खुलासा सरकारने तात्काळ करावा'; 'या' बड्या नेत्याची मागणी
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाला घडलेल्या दुर्घटनेने जनतेच्या मनात प्रचंड संशय आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही वेगळं सत्य दडलेलं आहे, याचा स्पष्ट आणि ठोस खुलासा राज्य सरकारने तात्काळ केला पाहिजे. चौकशी करू असे सांगणे पुरेसे नाही, तर ती चौकशी पारदर्शक, निष्पक्ष आणि वेळबद्ध असली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, अजित पवारांच्या अपघातप्रकरणाच्या चौकशीला होणारा विलंब स्वतःमध्ये संशय निर्माण करणारा आहे. गुजरातमधील विमान दुर्घटनेचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. अशा प्रकारची दिरंगाई म्हणजे सत्य दडपण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो. लोकशाहीत सरकारची जबाबदारी लोकांसमोर उत्तरदायी राहण्याची असते. रोहित पवार यांनी पायलट आणि विमानाच्या स्थितीबाबत जे मुद्दे मांडले आहेत, ते अत्यंत गंभीर आहेत. त्या सर्व मुद्द्यांची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. कोणाचंही नाव मोठं असो किंवा पद मोठं असो, चौकशीच्या कक्षेबाहेर कोणीही राहू नये.’
तसेच मला ही संपूर्ण माहिती माध्यमांद्वारे, विशेषतः टीव्हीवरून कळाली की “पूर्व विदर्भातील एका नेत्याने अजितदादांची फाईलवर सही घेण्यासाठी वेळ लावल्याने दादा विमानाने गेले. ही माहिती नंतर समोर आली आहे. गोंदियातील राईस मिल संदर्भातील एका फाईलमुळे त्यांना तातडीने विमान प्रवास करावा लागला, असेही सांगितले जात आहे. राईस मिल संदर्भातील ती फाईल गोंदिया जिल्ह्यातील असल्याने स्थानिक राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे संशयाची सुई जाते. मात्र, या सर्व बाबींचं खरे सत्य केवळ अधिकृत आणि निष्पक्ष चौकशीतूनच समोर येऊ शकते, असेही पटोले म्हणाले.
देशातील वरिष्ठ नेत्यांची नावे?
एपस्टिन फाईल्समध्ये जगातील आणि आपल्या देशातील वरिष्ठ नेत्यांची नावे आल्याची चर्चा आहे. अनेक लोकशाही देशांमध्ये केवळ नाव आलं तरी संबंधितांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले आहेत. मात्र, आपल्या देशात सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही नैतिक भूमिका घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. लोकसभेचे अध्यक्ष हे पक्षनिरपेक्ष असले पाहिजेत; पण जर ते सरकार वाचवण्यासाठीच भूमिका घेत असल्याचा आभास निर्माण होत असेल, तर तो लोकशाहीसाठी धोकादायक आहे. जनतेचा विश्वास अबाधित ठेवायचा असेल, तर सत्य समोर आणणे आणि जबाबदारांवर कारवाई करणे अनिवार्य आहे.
कोणतीही दडपशाही चालणार नाही
काँग्रेस पक्ष स्पष्टपणे सांगतो, या प्रकरणात कोणतीही दडपशाही चालणार नाही. सत्य बाहेर आलंच पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि जनतेच्या मनातील संभ्रम कायमचा दूर झाला पाहिजे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भूमिकेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.