
Ladki Bahin Scheme 2026, Installment Not Received Problem
राज्यातील विविध जिल्ह्यांतून याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येत आहेत. अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही खात्यात पैसे जमा झाले नसल्याची खंत व्यक्त केली आहे. काही महिलांच्या नावावर प्रत्यक्षात चारचाकी वाहन नसतानाही पोर्टलवर वाहनांची नोंद दिसत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थींनाही अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप महिलांकडून केला जात आहे.
सोलापूर आणि जालना जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयांवर धडक मोर्चा काढत थेट प्रशासनाला जाब विचारला. सोलापुरात तर दोन हजारांहून अधिक महिला कार्यालयात दाखल झाल्या होत्या. “ई-केवायसी केली, कागदपत्रे दुरुस्त केली, तरी पैसे का बंद झाले?” असा प्रश्न महिलांनी अधिकाऱ्यांना विचारला. अचानक वाढलेल्या तक्रारींमुळे अधिकारीही चांगलेच गोंधळले होते. त्याचवेळी परिसरातही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
जानेवारी २०२६ पासून राज्यातील अर्ध्या कोटींपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये केवळ सोलापूर जिल्ह्यातील सुमारे चार लाख महिलांचा समावेश आहे. काही महिलांना फेब्रुवारीपर्यंत हप्ते मिळाले, तर काहींना जानेवारीनंतर एकही हप्ता मिळालेला नाही.
योजनेत चारचाकी वाहन नसावे, ही महत्त्वाची अट आहे. मात्र अनेक महिलांकडे वाहन नसतानाही पोर्टलवर त्यांच्या नावावर वाहन दाखवले जात असल्याची तक्रार आहे. महिलांनी याबाबत आरटीओ कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोर्टलवरील चुकीच्या नोंदीमुळे लाभ बंद झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला असल्याचे दाखवणे, ई-केवायसीतील त्रुटी, वयाची चुकीची नोंद, तसेच कमी उत्पन्न असूनही आयकरदाते म्हणून नोंद झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये नाराजीचे वातावरण असून, सरकार या संदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.